मोदी-शहांचा करिष्मा! लोकांच्या घरची धुणीभांडी करणाऱ्या महिलेला भाजपने बनवलं आमदार
Tv9 Marathi May 05, 2026 02:45 PM

जे हात कालपर्यंत दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करायचे, लादी पुसायचे, त्याच हातात आता पश्चिम बंगालच्या जनतेनं त्यांच्या नशिबाची सुत्रे दिली आहेत. पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीचा निकाल हा अनेक अर्थांनी चकीत करणारा होता. त्यातही औसग्राम विधानसभा मतदारसंघातील ही बातमी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी वाटू शकते, परंतु प्रत्यक्षात हे घडलंय. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना पंख मिळाले आहेत. घरोघरी धुणीभांडीचं काम करून महिन्याला फक्त 2500 रुपये कमावणाऱ्या कलिता माझी यांनी राजकीय दिग्गजांवर मात करून विधानसभेत प्रवेश केला आहे. कलिता यांना भाजपकडून तिकिट मिळालं होतं आणि तिथल्या जनतेनं त्यांच्यावर विश्वास ठेवून आमदार म्हणून त्यांना निवडून दिलं आहे.

कोण आहेत कलिता माझी?

कलिता माझी या भाजपच्या नवनिर्वाचित आमदार आहेत. त्या औसग्राम (अनुसूचित जाती) मतदारसंघातून विजयी ठरल्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्या गेल्या दोन दशकांपासून इतरांच्या घरात धुणीभांडीचं काम करत होत्या. दोन – चार घरांमध्ये भांडी घासण्याचं आणि साफसफाईचं काम करून त्या महिन्याला सुमारे 2500 रुपये कमवत असत. या तुटपुंज्या उत्पन्नावर त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या.

BJP Bengal candidate Kalita Majhi, who works as a domestic worker in 4 households and earns ₹2,500 a month, wins from the Ausgram constituency. This is the power of the BJP, where even the most humble citizen can rise and script a truly inspiring journey. pic.twitter.com/LVI4V9xSFU

— P C Mohan (@PCMohanMP)

कलिता माझी यांनी 12,535 मतांच्या फरकाने औसग्राम मतदारसंघातील जागा जिंकली आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे श्यामा प्रसन्न लाहोरी यांचा पराभव केला आहे. माझी यांना एकूण 1,07,692 मतं मिळाली आहेत. त्यांनी घरोघरी जाऊन कसून प्रचार केला होता. अखेर त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. याआधी 2021 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने कलिता यांच्यावर विश्वास ठेवला होता. परंत या निवडणुकीत त्यांचा 12 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. कलिता या गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी बूथ स्तरीय कार्यकर्ते म्हणून सुरुवात केली आणि त्यानंतर पंचायच निवडणुकासुद्धा लढवल्या होत्या.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्यूहरचनेचं यश मानलं जात आहे. पश्चिम बंगालमध्ये कधीकाळी ममता यांच्या अत्यंत विश्वासू असलेले आणि आता भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी हे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार ठरले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.