Paydhuni Death : तब्बल साडेपाच तास… पायधुनीत चौघांच्या मृत्यूप्रकरणाबद्दल धक्कादायक अपडेट समोर
Tv9 Marathi May 06, 2026 01:45 PM

मुंबईतील पायधुनी येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने अख्खी मुंबई हादरली. डोकडिया कुटुंबातील 1 पुरुष, 1 महिला आणि त्यांच्या दोन लहान मुलींचा अकस्मात मृत्यू झाला. या घटनेने लर्वांनाच मोठा धक्का बसला असून त्यांनी बिर्याणी खाल्ली, त्यानंतर मध्यरात्री कलिंगड खाल्ल, पहाटे त्यांना जुलाब व उलट्या झाल्या व चौघांनी जीव गमावला. याच केसमध्ये तपासाला वेग आला असून आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी मुंबईतील जेजे रुग्णालयात ‘डेथ ऑडिट’ सुरू आहे. डोकडिया कुटुंबातील चौघांनी जेवणानंतर कलिंगड खाल्लं, ते झोपले, मात्र थोड्या वेळाने कुटुंबातील चार सदस्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृकती बिघडल्याचं लक्षात आल्यावर सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेण्यात आले, मात्र प्रकृती बिघडत गेल्यानंतर त्यांना उशिराने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे अखेर त्यांचा मृत्यू झाला.

‘गोल्डन अवर’ गमावल्याने परिस्थिती गंभीर

या प्रकरणी वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, डोकडिया कुटुंबातील सदस्यांना, या रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात सुमारे साडेपाच तासांचा विलंब झाला. आणि ‘गोल्डन अवर’ गमावल्याने त्या चौघांची परिस्थिती गंभीर बनली अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, फॉरेन्सिक तपासात तीव्र विषबाधेची शक्यता व्यक्त करण्यात आली असून अन्नामध्ये ‘मॉर्फिन’सारख्या विषारी घटकांचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

एफडीएच्या तपासात कलिंगडामध्ये कोणतीही भेसळ आढळली नसल्याचे समोर आले असून त्यामुळे आता विषप्रयोग किंवा अन्य कारणांवर तपास केंद्रित करण्यात आला आहे. या प्रकरणी जे.जे. मार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून विषशास्त्र अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

काय आहे प्रकरण ?

25 एप्रिल रोजी डोकाडिया कुटुंबाने रात्री साडेदहाच्या सुमारास बिर्याणी खाल्ली. त्यानंतर ते घरी आले. रात्री एकच्या सुमारास मुलांना पुन्हा भूक लागली. म्हणून त्यांनी कलिंगड कापून खाल्लं. मात्र पहाटेच्या सुमारास सर्वांनाच उलट्या, जुलाब होऊ लागले.त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने अख्ख शहर हादरलं. बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्याने हा त्रास झाला का असाही सवाल उपस्थित झाला. त्यामुळे अनेकांच्या मनात धास्तीही बसली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.