Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal: मराठा समाजातील तरुणांना हक्काचा रोजगार आणि उद्योजक बनवण्याचे स्वप्न दाखवून स्थापन झालेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सध्या निधीअभावी अडचणीत सापडले आहे. महामंडळाच्या माध्यमातून 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना सुरुवातीला अत्यंत यशस्वी ठरली. मात्र, गेल्या वर्षभरापासून या योजनेतील लाभार्थ्यांना व्याजाचा परतावा वेळेवर मिळत नसल्याने राज्यभरातून मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. सध्या महामंडळाने सरकारकडे 400 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. हा निधी मिळाल्यासच प्रलंबित व्याजाचा प्रश्न सुटू शकणार आहे. तोपर्यंत मात्र राज्यातील हजारो मराठा तरुण उद्योजक हप्त्यांच्या ओझ्याखाली दबले जात आहेत.
सरकारकडून व्याजाचा परतावा मिळत नसल्याने लाभार्थ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेक तरुण उद्योजकांनी आपला व्यवसाय टिकवण्यासाठी आणि योजनेतून बाद होऊ नये म्हणून बँकांचे हप्ते भरण्यासाठी चक्क सावकारांकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीवर बोलताना महामंडळाचे (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) माजी उपाध्यक्ष संजय पवार यांनी राज्य सरकारकडे तातडीने व्याजाचा परतावा करण्याची मागणी केली आहे. "अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेले हे महामंडळ सरकार बंद करण्याच्या विचारात आहे का?" अशी शंका आता उपस्थित होत आहे. दुसरीकडे, सरकारने लवकरात लवकर निधी न दिल्यास राज्यभर 'बोंब मारू' आंदोलन करण्याचा इशारा मराठा महासंघाचे वसंत मुळीक यांनी दिला आहे.
| तपशील | आकडेवारी |
| एकूण नोंदणीकृत अर्जदार | 4 लाख 22 हजार |
| बँक कर्ज मंजूर लाभार्थी | 1 लाख 80 हजार |
| वितरित केलेली कर्ज रक्कम | 18 हजार 222 कोटी रुपये |
| आतापर्यंत झालेला व्याज परतावा | 1,633 कोटी 51 लाख रुपये |
| महामंडळाची सरकारकडे नवीन मागणी | 400 कोटी रुपये |
नियमानुसार लाभार्थ्याने बँकेचे तीन हप्ते नियमित भरले की महामंडळ त्यावरील व्याजाचा परतावा लाभार्थ्याच्या खात्यात जमा करते. जर एक जरी हप्ता चुकला, तर लाभार्थी योजनेतून कायमचा बाद होतो. या भीतीपोटी मराठा तरुणांनी बँकांचे हप्ते वेळेवर भरले, पण आता सरकारने व्याजाचा परतावा रोखल्याने हे तरुण आर्थिक कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे लवकरात कर्जाचा परतावा सरकारकडून हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी तरुणांकडून केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या