भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षात बिघडले आहेत. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घातल असल्याने भारताने संबंध मोडले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला इंगा दाखवला आहे. त्याचा परिणाम क्रिकेट मैदानावरही दिसून आला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जात नाही आणि पाकिस्तानने गेल्या वर्षात तसाच पवित्रा घेतला आहे. असं असताना भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्याची परवानगी दिली आहे. भारत सरकारच्या मते, देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी अनेक देश भाग घेतात. अशा स्थितीत पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊन खेळू शकतात.
भारत सरकारने सांगितलं की, ‘भारताकडे यजमानपद असलेल्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानी खेळाडू भाग घेऊ शकतात. पण भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यास जाणार नाही.’ म्हणजेच पाकिस्तानी खेळाडू आशिया कप, वर्ल्डकप सारख्या स्पर्धा भारतात होत असल्यास येऊ शकतात. त्यांना भारतात येण्याची परवानगी असणार आहे. पण भारत पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणार नाहीत. 2012 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. भारत आणि पाकिस्तान दरम्यान शेवटची कसोटी मालिका 2007-2008 मध्ये भारतात खेळली गेली होती, जी भारताने 1-0 ने जिंकली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी 2029 आणि वनडे वर्ल्डकप 2031 चं यजमानपद भारत भूषवणार आहे, या स्पर्धेत पाकिस्तानचा सहभाग असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत अडचणी येऊ नयेत म्हणून आधीच धोरण जाहीर केल्याची चर्चा आहे.
आयसीसी स्पर्धेत दोन्ही संघांनी एकमेकांच्या देशात खेळण्यास नकार दिल्याचा दोन प्रकार घडले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. त्यामुळे भारताचे सर्व सामने युएईत झाले. त्यानंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद श्रीलंका आणि भारताकडे होतं. या स्पर्धेत पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. दुसरीकडे, बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्याने त्यांना स्पर्धेत खेळता आलं नाही.