श्रमजीवी संघटनेच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल
esakal May 06, 2026 09:45 PM

भिवंडी, ता. ६ (वार्ताहर) : आदिवासी आणि कष्टकरी समाजासाठी गेली ४३ वर्षे कार्यरत असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या राज्य अधिवेशनात राज्य; तसेच ठाणे-पालघर जिल्हा कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले. संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या अधिवेशनात संघटनेची धुरा नव्या पिढीकडे सोपवण्यात आली. सीता घाटाळ यांची राज्याध्यक्षपदी, तर आतापर्यंत सरचिटणीस म्हणून कार्यरत असलेले बाळाराम भोईर यांची राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अधिवेशनात दोन्ही जिल्ह्यांतील तालुक्यांच्या प्रतिनिधींनी वनजमीन, पाणीटंचाई, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत प्रश्नांवर आगामी काळासाठी कृती आराखडा सादर केला. त्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. राज्य कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी दत्तात्रेय कोळेकर आणि लक्ष्मण सवर, सरचिटणीसपदी विजय जाधव, तर खजिनदारपदी सुनील जाधव यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी मावळत्या पदाधिकाऱ्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांकडे संघटनेचा अधिकृत झेंडा आणि प्रतिमा सुपूर्द करून जबाबदारीचे हस्तांतरण केले. सर्व नव्या पदाधिकाऱ्यांनी शपथ घेतली. सूत्रसंचालन दशरथ भालके यांनी केले, तर कैलास तुंबडा यांनी आभार मानले.

जिल्हा कार्यकारिणी जाहीर
ठाणे जिल्हाध्यक्षपदी अशोक सापटे यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी सागर देसक, राजेंद्र म्हस्कर, मुकेश भांगरे, ईश्वर बनसोडे, जयेंद्र गावित, लक्ष्मण चौधरी, बाळू वाघे आणि संतोष गावित यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा सचिव म्हणून राजेश चन्ने व दशरथ भालके, तर महिला अध्यक्षा म्हणून जया पारधी यांची निवड झाली.
पालघर जिल्हाध्यक्षपदी सुरेश रेंजड यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून रामचंद्र रोज, वसंत पवार, लक्ष्मण पडवळे आणि अंकुश वड, जिल्हा सचिवपदी गणेश उंबरसाडा व कैलास तुंबडा, महिला प्रमुखपदी रेखा पऱ्हाड, तर महिला सचिवपदी दमयंती निंबारे यांची नियुक्ती करण्यात आली.

तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांची निवड
अंबरनाथ, कल्याण, ठाणे, मिरा-भाईंदर, भिवंडी ग्रामीण, भिवंडी शहर, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांतील विविध पदाधिकाऱ्यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली. महिला पदाधिकाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली.

विवेक पंडित भावुक
निवडीची घोषणा करताना संस्थापक विवेक पंडित भावुक झाले. गेली ४३ वर्षे मी ही संघटना उभी राहतानाचा प्रवास अनुभवला आहे. घराघरात जाऊन सभासद नोंदणी केली, तर विद्युलता पंडित यांनी महिलांना संघटित केले. त्याचेच फलित म्हणजे आज संघटनेत ७० टक्के महिला सभासद आहेत. संघटना सुरू होत असताना जन्मलेली महिला आज अध्यक्ष होत आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, अशा शब्दांत त्यांनी नव्या नेतृत्वाचे अभिनंदन केले.

पुढील ४० वर्षांसाठी सक्षम नेतृत्व
वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी नवनियुक्त अध्यक्ष सीता घाटाळ यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडताना श्रमजीवी संघटना नेहमीच सामूहिक नेतृत्वावर विश्वास ठेवत असल्याचे सांगितले. यापूर्वीही दोन महिलांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली असून आता तिसऱ्या महिलेकडे नेतृत्व सोपवण्यात आल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. नव्या नियुक्त्यांमुळे संघटना आगामी काळात अधिक वेगाने विस्तारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.