आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 50 व्या सामन्यात आज 7 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने फिल्डिंगचा निर्णय घेत लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये केलेल्या बदलांबाबत जाणून घेऊयात.
गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. तर लखनौने 3 बदल केले आहेत. जोश इंग्लिस, मोहसीन खान आणि आवेश खान या तिघांना बाहेर करण्यात आलं आहे. तर अर्शीन कुलकर्णी, दिग्वेश राठी आणि शाहबाज अहमद यांचा समावेश करण्यात आला आहे. लखनौ अर्जुन तेंडुलकर याला संधी देईल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र तसं झालंले नाही. त्यामुळे अर्जुनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळवण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
लखनौ आणि आरसीबी दोन्ही संघांचा हा या हंगामातील दहावा सामना आहे. आरसीबीने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर लखनौला 9 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे लखनौला प्लेऑफमधील आपलं जर तरचं आव्हान कायम राखायचं असेल तर आरसीबी विरुद्ध कोणत्याही स्थिती सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे पंतसेना आरसीबीला पराभूत करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ आहे. दोन्ही संघांत 15 एप्रिलला सामना खेळवण्यात आला होता. आरसीबीने त्या सामन्यात लखनौवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता लखनौ आरसीबीवर मात करुन गेल्या पराभवाची परतफेड करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आरसीबीने टॉस जिंकला
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, रसिक सलाम दार आणि जोश हेजलवुड.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श, अर्शिन कुलकर्णी, निकोलस पूरन, एडन मार्करम, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), अक्षत रघुवंशी, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेश सिंग राठी, मोहम्मद शमी आणि प्रिन्स यादव.