सोलापूर : सोलापूर शहरातील सत्तर फूट रोड नेहमीच वर्दळीचा... भर सकाळी नऊच्या सुमारास जीमवरून घरी निघालेल्या तरुणाचा सहा जणांनी रस्त्यावरच निर्घृण खून केला. यामुळे शहर पोलिसांचा गुन्हेगारांमधील धाक कमी झालाय का, असा सवाल उपस्थित होऊ लागला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही त्याअनुषंगाने पोलिसांना निवेदन दिले. या घटनेनंतर पोलिसांनी आता बंद पडलेली कागदावरील रात्रीची नाकाबंदी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही पाळत ठेवली जात आहे. त्यांच्या संशयास्पद हालचाली जाणून घेण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशनही राबविले जात आहे.
सोलापूर शहरात सात पोलिस ठाणी असून, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री नाकाबंदीचा निर्णय झाला होता. अधूनमधून रेकॉर्डवरील संशयित आरोपींवर लक्ष ठेवून त्यांच्याकडे चौकशी देखील केली जायची. मात्र, पोलिसांची ही कार्यवाही काही दिवसांपासून बंद पडली होती. पण, कुंचीकोरवी गल्लीतील सहा जणांनी कट रचून सुरेश कृष्णा श्रीराम (रा. रफिक नगर, एमआयडीसी, सोलापूर) या तरुणाचा रविवारी भर रस्त्यातच खून केला.
संशयित काहीजण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, मृत सुरेश देखील सराईत गुन्हेगार होता. खुनानंतर सामान्य जनतेच्या मनातील गुन्हेगारांबद्दलची भीती दूर करून जनतेचा पोलिसांवरील विश्वास दृढ व्हावा म्हणून सोलापूर शहर पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. शहरातील रात्रगस्त, गुडमॉर्निंग पथके, नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन या सर्व बाबींची माहिती शहर गुन्हे शाखेसह सातही पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दररोज पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांना द्यावी लागणार आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष
आता दररोज प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री नाकाबंदी असेल. सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेदहापर्यंत पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अधिकाऱ्यांची व तेथील गुन्हे प्रकटीकरण पथकांची गस्त राहील. शहर गुन्हे शाखेचेही अधिकारी-अंमलदार त्याठिकाणी असतील. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर दररोज लक्ष ठेवले जात असून आवश्यक त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनदेखील राबविले जात आहे.
- डॉ. अश्विनी पाटील, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
गर्दीच्या ठिकाणी दोन तास गस्त; दररोज रात्री तीन तासांची नाकाबंदी
आता शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी किंवा आवश्यक त्या परिसरात सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत पोलिस ठाण्यांचे अधिकारी, गुन्हे प्रकटीकरण पथकाची गस्त राहील. त्यानंतर रात्री ११ ते पहाटे २ वाजेपर्यंत नाकाबंदी असेल. यावेळी विनाकारण घराबाहेर फिरणारे किंवा मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. दुसरीकडे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार दिवसा-रात्री कोठे असतात, त्यांची दिनचर्या काय, यावरही कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. जेणेकरून भविष्यातील गंभीर घटना टळतील, हा त्यामागील हेतू आहे.