…तर राज ठाकरेंनी उठबश्या मारायच्या, गुणरत्न सदावर्तेंचं थेट चॅलेंज
Tv9 Marathi May 09, 2026 10:45 PM

ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते हे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जालन्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या गाडीवर सुपाऱ्या देखील फेकल्या. या घटनेवर प्रतिक्रिया देताना आता सदावर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  यावेळी बोलताना त्यांनी मनसेवर गंभीर आरोप देखील केले आहेत. मी डंके की चोट पर हेच म्हणेल की राज ठाकरे यांची वैचारिक लढण्याची कुवत संपली आहे का? असा सवाल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. तसेच आज जो काही प्रकार घडला त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ होता, ते ऑइल आहे, त्यांचा जाळायचा उद्देश होता का? असंही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले सदावर्ते? 

मी डंके की चोट पर हेच म्हणेल की राज ठाकरे यांची वैचारिक लढण्याची कुवत संपली आहे. आज जो काही प्रकार घडला त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ होता, ते ऑइल आहे, त्यांचा जाळायचा उद्देश होता का? राज ठाकरे तुम्हाला सांगतो तुमच्या माणसांनी माझ्या गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी मनसेवर केला आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, मी राज ठाकरे यांना आव्हान करतो की ते जिथे म्हणतील तिथे वैचारिक चर्चा करू,  वैचारिक चर्चेमध्ये राज ठाकरे हारले तर त्यांनी उठबश्या मारायच्या.  आणी मी जर हरलो तर राज ठाकरे जी म्हणतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका  

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. त्यांच्या रेतीचे टीप्पर मोजायला मला माणूस पाठवावा लागेल असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, त्यावरून देखील सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.