सोलापूर : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील दिराने २ मे रोजी पहाटे झोपेतील विधवा वहिनी व तिच्या दोन मुलांचा निर्घृण खून केला. बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीतील शंकर दत्तात्रय मस्के याला पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये पकडले. घटनेदिवशी त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व मेव्हणा घरीच होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्या दिवशी शंकरचा मुलगा, मेव्हणा तेथील लोकांना वेगळेच सांगत होते, त्यांचा खोटारडेपणा पोलिस तपासात उघड झाला आहे.
पतीच्या मृत्यूनंतर विधवा वहिनीने दिर शंकरला हातउसने २५ लाख रुपये दिले होते. पण, तो दोन वर्षांपासून पैसे परत देत नव्हता आणि पतीच्या वाट्याची जमीन देखील देत नव्हता. त्यातून शंकर मस्के व त्याची विधवा वहिनी गायत्री सुधाकर मस्के यांच्यात दररोज वाद होत होते. त्यातून त्याने वहिनी व तिच्या दोन्ही मुलांना संपविण्याचा प्लॅन आखला आणि २ मे रोजी उकाड्यामुळे घराच्या छतावर झोपलेल्या वहिनीला व तिच्या दोन्ही मुलांवर (प्रियांका व शिवराज) तलवारीने वार करून ठार मारले. खुनानंतर शंकरने त्याची पत्नी राणी व मुलगी दीक्षा यांना गावी पाठवून दिल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे.
मात्र, घटनेच्या दिवशी शंकरची पत्नी व मुलगी नातेवाईकांच्या विवाहासाठी पुण्याला गेल्याचे त्याचा मेव्हणा व मुलगा पोलिसांना सांगत होता. मात्र, या क्रूर कृत्याची माहिती शंकरची पत्नी राणी, मुलगी दीक्षा, मुलगा धीरज (सर्वजण रा. बोरामणी), मेव्हणा सूरज महादेव मोरे (रा. तलमोड, ता. उमरगा) व हॉटेलमधील शंकरचा मित्र सचिन शिवाजी वाघमारे यांना होती, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, न्यायालयाने त्या पाचही संशयितांना उद्यापर्यंत (ता. ११) पोलिस कोठडी ठोठावली असून त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात नेले जाणार आहे. तर शंकरला १४ मेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
मुख्य सूत्रधार शंकर पोलिसांना म्हणाला...
पैसे आणि जमिनीच्या वाटणीवरून वहिनी सतत किरकिर करीत होती. सकाळ-संध्याकाळी ती शिवीगाळ करीत होती, वाद घालत होती. त्या रागातून तिला मारण्याचे ठरवले. त्या दिवशी तिला मारले, त्यावेळी तिची मुले मध्ये आली आणि त्यांनाही मारल्याचे शंकर मस्के सांगत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पण, त्याने त्या दिवशी तिघांनाही जीवे ठार मारण्याचा प्लॅन आखला होता, असा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.