आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी… राज ठाकरे यांचं पंतप्रधानांना आवाहन काय? का होतेय पत्राची चर्चा?
Tv9 Marathi May 12, 2026 02:45 PM

पश्चिम आशियात वाढत चाललेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे. विशेषतः इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याने त्याचा परिणाम इंधन आणि सोन्याच्या बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नसेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेल, तेल आणि सोन्याच्या खरेदीबाबत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधानांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध स्तरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत एक पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केले असून त्याची मोठी चर्चा रंगली आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, एकीकडे देशातील जनतेला पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचा आणि परदेश दौरे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठमोठे ताफे रस्त्यावर दिसतात. शेकडो गाड्यांसह निघणाऱ्या या ताफ्यांमुळे नेमका कोणता संदेश दिला जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, “आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी असे करणार नाही,” असे स्पष्टपणे देशाला सांगण्याची तयारी सरकार दाखवणार का? असा थेट प्रश्नही राज ठाकरे यांनी पत्रातून विचारला आहे.

“निर्णय सरकारचे आणि त्याचा त्रास सामान्य जनतेने का सहन करायचा?” असा मुद्दाही त्यांनी उपस्थित करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. सध्या राज ठाकरे यांच्या या पत्राची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.