लाडक्या बहिणींचे पैसे अचानक बंद! सरकारी ऑफिसमध्ये मोठी गर्दी; तुमचं नाव तर नाही ना?
Tv9 Marathi May 20, 2026 07:45 PM

Ladki Bahin e-KYC : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. याच योजनेमुळे महायुतीला सत्तेची चव चाखता आली. सरकार या योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत करते. परंतु गेल्या काही महिन्यांत लाडक्या बहिणींच्या अर्जांची छानणी करण्यात आली. या प्रक्रियेत आतापर्यंत लाखो महिलांचे नावे या योजनेतून वगळण्यात आली. सध्या सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात पाठवले आहेत. परंतु अनेक महिलांना हे पैसेच मिळालेले नाहीत. ई-केवायसी केली नसल्याने तसेच अर्जातील इतर त्रुटीमुळे अनेक महिलांना याबाबतचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळेच आता संबंधित शासकीय कार्यालयात गर्दी करत आहेत. पैसेच बंद झाल्याने या महिला हतबल आहेत.

नेमकं काय घडलं?

सध्या नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. काही लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसेच मिळालेले नाहीत. काही महिलांना तर जानेवारी महिन्यापासून योजनेची रक्कम खात्यात जमा झालेली नाही. त्यामुलेच अनेक महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालय गाठत प्रशासनाला जाब विचारला. बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावा महिलांकडून केला जात असला, तरी तांत्रिक अडचणी आणि अपूर्ण माहितेमुळे अनेक लाभार्थ्यांची लाडकी बहीण योजनेची केवायसी रखडल्याचं समोर येत आहे.

शिंदे म्हणाले ई-केवायसी होतच राहील

भर उन्हात महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर महिलांनी गर्दी करत लवकरात लवकर केवायसी पूर्ण करून थकीत लाभ देण्याची मागणी केली आहे. आता या वंचित लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंधेरीतील एका कार्यक्रमात बोलताना ई-केवायसी होतच राहील, असे विधान केले. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी पुन्हा एकदा दिली जाणार का? असा सवाल उपस्थित केला आत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.