Twisha Sharma Case: त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात भोपाळचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्विशाच्या मृतदेहाचे दुसरे पोस्टमार्टम (Twisha Sharma Case) भोपाळच्या एम्स (AIIMS) रुग्णालयातच केले जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच, मुख्य आरोपी समर्थ सिंहला न्यायालयात हजर करून पोलीस त्याची ७ दिवसांची कोठडी (रिमांड) मागणार आहेत, जेणेकरून या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा तपास करता येईल.(Twisha Sharma Case)
पोलीस आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत ताकीद दिली आहे की, "गेल्या १० दिवसांपासून फरार असलेला समर्थ जिथे कुठे लपला होता, त्याला आश्रय देणाऱ्या आणि वाचवणाऱ्यांवरही पोलीस कडक कारवाई करतील." एवढेच नव्हे तर, या प्रकरणातील दुसरी आरोपी आणि समर्थची आई (निवृत्त जिल्हा न्यायाधीश) गिरिबाला सिंह यांचीही सखोल चौकशी केली जाईल.(Twisha Sharma Case)
VIDEO | Twisha Sharma Death Case | Bhopal, Madhya Pradesh: Bhopal Police Commissioner Sanjay Kumar says, "First his (Samarth Singh) medical will be done and we will seek a PR from the court. We will seek a 7 day police remand. We will interrogate him further... If it is found… pic.twitter.com/1cLhI3Gsuy
— Press Trust of India (@PTI_News) May 23, 2026
पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस आयुक्तांनी सांगितले की, समर्थ सिंह हा जबलपूरमध्ये आत्मसमर्पण (सरेंडर) करण्यासाठी पोहोचला होता. भोपाळ पोलिसांचे पथकही तिथे दाखल झाले होते. मात्र, न्यायालयाने त्याचे सरेंडर स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर जबलपूर पोलिसांच्या मदतीने भोपाळ पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले आणि मध्यरात्री त्याला भोपाळला आणण्यात आले. आता समर्थची वैद्यकीय चाचणी (Medical Test) करून त्याला कोर्टात हजर केले जाईल आणि ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली जाईल.
आरोपी सासू गिरिबाला सिंह यांच्याबाबत पोलिसांनी सांगितले की, त्यांना आतापर्यंत चौकशीसाठी ३ वेळा नोटीस पाठवण्यात आली आहे, मात्र त्या हजर झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे. दुसरीकडे, गिरिबाला सिंह या आपल्याला एकही नोटीस मिळाली नसल्याचा दावा करत आहेत. यावर पोलीस आयुक्तांनी सांगितले की, "आम्ही त्यांना ३ नोटिसा पाठवल्या आहेत. त्या नकार देत असतील तर ती वेगळी गोष्ट आहे, पण पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून आमचा प्रयत्न आहे की त्यांची लवकरात लवकर चौकशी केली जावी."
त्विशा शर्माच्या मृत्यूनंतर गिरिबाला सिंह यांनी वेगवेगळ्या लोकांना ४६ फोन फिरवले होते, त्यांचीही चौकशी केली जाणार का? या प्रश्नावर संजय कुमार यांनी सांगितले की, त्विशाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीची आम्ही दखल घेतली असून या ४६ कॉल्सनाही तपासाचा भाग बनवले आहे. तपासात ज्या गोष्टी समोर येतील, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल.
त्विशाच्या कुटुंबीयांनी आरोप केला होता की, पोलीस ठाण्यात त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले आहे. या आरोपाचे खंडन करत पोलीस आयुक्तांनी सांगितले की, "कोणाशीही गैरवर्तन किंवा बदसलूकी करण्यात आलेली नाही. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवले आहेत, गरज पडल्यास त्याचे फुटेज तपासले जाऊ शकते."
Miss Pune हा किताब पटकावलेल्या नोएडाच्या त्विशा शर्मा या 33 वर्षीय विवाहितेचा मृतदेह भोपाळ मधील तिच्या सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यावेळी ती दोन महिन्यांची गरोदर होती. 12 मे 2026 ला त्विशाने तिचा आयुष्य संपवलं. तिचा नवरा समर्थ सिंग हा पेशाने वकील आहे. त्यांची ओळख 2024 मध्ये डेटिंग ॲप द्वारे झाली होती. 2025 मध्ये दोघांनी लग्न केलं. मुळची नोएडाची असलेली त्विशा लग्नानंतर भोपाळला गेली. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच त्विशाचा मृतदेह तिच्या घरी आढळला .
मृत्यूपूर्वी तिने इंस्टाग्राव (instagram) वर तिच्या मैत्रिणीला काही मेसेज केले होते. ते सध्या समोर आले आहेत. शिवाय त्विशाच्या आई-वडिलांनी आणि भावानेही तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्विशाला झालेला त्रास तिने तिच्या मैत्रिणीला सांगण्याचा प्रयत्नही केला होता. तिच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा तिने त्विशाशी संपर्क केला त्यावेळी ' लग्नाच्या जाळ्यात मी अडकून पडले आहे ' तू यात अडकू नकोस. मला माहेरची आठवण येत आहे. मी नेमकं काय करावं हेच मला समजत नाहीये. माझ्या परीने मी प्रयत्न करते पण मला कोणीही समजून घेत नाही.. असं तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं होतं. हेच शब्द तिच्या अखेरचे शब्द ठरले.
12 मे रोजी भोपाळमधील कटारा हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत 33 वर्षीय त्विशा शर्मा हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मात्र, त्विशाच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा थेट आरोप केला आहे. ट्विशाचा पती आणि सासूने तिची हत्या करून आत्महत्येची खोटी कथा रचल्याचा दावा वडील व भावाने केला आहे. कटारा हिल्स पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पती समर्थ, सासू गिरीबाला सिंह यांच्याविरुद्ध हुंडाबळी आणि छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी 6 सदस्यांची विशेष तपास समिती (SIT) स्थापन केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.