पुणे : मनीषा हवालदार या आणखी एका प्राध्यापिकेला नीट पेपरफुटी (NEET Paper Leak) प्रकरणात सीबीआयने अटक केली. त्यामुळे NTA मध्ये नियुक्त असलेले तीन विषयांचे तीन शिक्षक पुण्यातून अटक झाल्याचं चित्र आहे. मनिषा मांढरे या बायोलॉजीचा पेपर सेट करण्यासाठी, मनिषा हवालदार या फिजिक्सचा पेपर सेट (NEET Paper Leak) करण्यासाठी तर पी.व्ही.कुलकर्णी हा केमिस्ट्रीच्या पेपरचे भाषांतर करण्यासाठी NTA मधे काम करत होता. भारतासारख्या इतक्या मोठ्या देशात, हजारो शिक्षक असताना पुण्यातीलच तीन शिक्षकांची NTA मध्ये निवड होणं NTA च्या कारभाराबद्दल संशय निर्माण करणार ठरतंय. विशेष म्हणजे हे तीन शिक्षक पुण्यातील शिवाजीनगर, डेककन आणि बुधवार पेठ या दोन ते तीन किलोमीटरच्या रेडीयसमधे असलेल्या शिक्षण संस्थेत किंवा क्लासमधे शिकवत होते.(NEET Paper Leak)
आधी मनीषा वाघमारे, मग मनीषा मांढरे आणि आता मनीषा हवालदार... NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी एका मनीषाला अटक केलीय. यावेळी अटक केलेल्या मनीषा हवालदार या पुण्याच्या बुधवार पेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत मागील ३४ वर्षांपासून फिजिक्स शिकवत होत्या आणि शाळेच्या मुख्याध्यापिका देखील होत्या. NTA मध्ये फिजिक्स विषयाचा पेपर सेट करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्या NEET मध्ये काम करत होत्या याची माहिती न त्यांच्या महाविद्यालयातील सहकाऱ्यांना होती न संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना. (NEET Paper Leak)
या आधी सीबीआयने शिवाजी नगर भागातील मॉडर्न महाविद्यालयात बायोलॉजी शिकवणाऱ्या आणि NTA मध्ये पेपर सेटिंगचं काम करणाऱ्या मनीषा मांढरेना अटक केली. तर पुण्यातील डेक्कन भागातील मोटेगावकरच्या क्लासमध्ये केमिस्ट्री शिकवणाऱ्या आणि NTA मध्ये केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिकेच मराठीत भाषांतर करण्याची जबाबदारी असलेल्या पी.व्ही.कुलकर्णीला देखील बेड्या ठोकल्यात. त्यामुळं फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांसाठी NTA मध्ये काम करणारे तीन शिक्षक पुण्यातून अटक झालेत.
इतक्या मोठ्या खंडप्राय देशात हजारो शिक्षक असताना NEET कडून पुण्यातील तीन शिक्षकांचीच निवड का करण्यात आली? ही निवड करण्यामागे कोणाचा हात होता? NTA मधील कोणी अधिकारी सामील असल्याशिवाय या निवडी होऊ शकतात का? आणि या टोळीने पेपर याआधी देखील पेपर फोडला होता का? हे असे अनेक प्रश्न सध्या लोकांच्या मनात आहेत. NTA कडून या प्रश्नांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे.NTA कडून ती नाही मिळाली तर सीबीआयने तपासाच्या माध्यमातून ती देणं गरजेचं आहे. कारण NTA ची विश्वासहार्यता पणाला लागली आहे.
NEET च्या या पेपर फुटीची व्याप्ती वाढत चाललीय. पेपर फोडणारे, त्यांची विक्री करणारे अटकेत आहेत तर ज्यांनी स्वतःच्या मुलांसाठी पेपर विकत घेतला असे पालक चौकशीच्या फेऱ्यात आहेत. पुणे , लातूर आणि इतरही शहरांतील अनेक डॉकटर्सची सीबीआयकडून चौकशी केली जाते आहे. स्वतःच हॉस्पिटल पुढं चालवायचं असेल तर स्वतःच्या मुलाला देखील डॉक्टर बनवावं लागेल हे ओळखून या डॉकटर्सनी लाखो रुपये मोजून NEET चा फुटलेला पेपर विकत घेतल्याचा संशय आहे. सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास देशातील विविध शहरांमध्ये होत असला तरी या घोटाळ्याचा केंद्रबिंदू पुणे असल्याचं एव्हाना स्पष्ट झालंय. त्यामुळं कोणाच्या प्रभावाने या शिक्षकांची NTA मध्ये नियुक्ती झाली हा प्रश्न विचारला जातोय.
NEET पेपर फुटीच्या या प्रकरणाला अद्याप राजकीय वळण मिळालेलं नाही. पण राजकीय हस्तक्षेपाशिवाय एकाच शहरातील शिक्षक NTA मध्ये नियुक्त होऊ शकतात का? NTA बद्दल उपस्थित होणाऱ्या या अशा प्रश्नांना बगल देत NTA संचालक पवनकुमार शर्मा आणि महासंचालक अभिषेक सिंग यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केलाय. मात्र NTA बद्दल गमावलेला विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर सी बी आय ने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जो कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.