देशातील सर्वात मोठे तोफगोळे, 365 दिवस पुरतील इतकं उत्पादन, ड्रोन आणि मिसाईल्स, साईंच्या शिर्डीत भक्तीसोबत शक्तीचा नवा प्रकल्प
नितीन ओझा, एबीपी माझा May 23, 2026 08:43 PM

कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात ऐतिहासिक आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत'चा जो संदेश दिला होता, त्याची यशस्वी अंमलबजावणी आज होताना दिसत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने संरक्षण क्षेत्रात इतकी मोठी प्रगती केली आहे की, आज आपला देश केवळ स्वावलंबी बनला नसून संरक्षण साहित्याचा मोठा निर्यातदार बनला आहे.

पुढे ते म्हणाले की, "महाराष्ट्राच्या मातीतील ग्रामीण भागातील युवक गणेश निबे यांनी जे काम इथे उभे केले आहे, ते अत्यंत गौरवास्पद आणि कौतुकास्पद आहे. निबे यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास होता आणि याच आत्मविश्वासाच्या बळावर हा भव्य प्रकल्प आज उभा राहिला आहे. त्यांनी या ठिकाणी जी उत्पादने तयार केली आहेत, ती देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या ठिकाणी जे तोफगोळे तयार होणार आहेत, ते खूप महत्त्वाचे काम आहे. वर्षभर या प्रकल्पात उत्पादनाचे काम अखंडपणे सुरू राहील, अशी अजोड तयारी त्यांनी केली आहे. निबे यांनी 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंत अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे निर्माण केली आहेत. जर देशावर युद्धाची वेळ आली, तर 360 ते 365 दिवस सलग दारूगोळा पुरवण्याची क्षमता या एकाच प्रकल्पात आहे. यासोबतच शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने गाईड केलेले अत्याधुनिक ड्रोन देखील येथे तयार होत आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्याला आत्मनिर्भर भारताचा खरा प्रत्यय आला. पाकिस्तानने अनेक देशांच्या मदतीने भारताच्या सीमेवर अनेक ड्रोन पाठवले होते. मात्र, आपल्या शूर सैनिकांनी त्या सर्व ड्रोनना हवेतच नष्ट करून पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले."

"आता आपला अहिल्यानगर जिल्हा हा डिफेन्स उत्पादनाचे मुख्य हब बनला आहे. केवळ इथेच नाही, तर नाशिक, पुणे आणि नागपूर मध्ये देखील असाच भव्य 'डिफेन्स कॉरिडॉर' तयार केला जाणार आहे. या प्रकल्पांना संरक्षणमंत्र्यांनी देखील मंजुरी दिली आहे. गणेश निबे यांना मी ग्वाही देतो की, तुम्हाला महाराष्ट्रात जिथे पाहिजे तिथे सरकार जमीन देईल. आपल्याला आता महाराष्ट्रात संरक्षण क्षेत्रात खूप मोठे काम करायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमासाठी येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही खाजगी चॉपर, विमान किंवा गाड्यांचा मोठा ताफा न वापरता मुंबई ते शिर्डी असा प्रवास 'वंदे भारत एक्सप्रेस'ने केला. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा निर्णय घेतला, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.