सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदाला गवसणी घातली. पण त्याची कामगिरी मात्र निराशाजनक राहिली. अशा स्थितीत भविष्याच्या दृष्टीकोनातून सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद ठेवायचं की नाही असा प्रश्न आहे. कारण आयपीएल स्पर्धेत सूर्यकुमार यादव चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याचं संघातील स्थान डळमळीत झालं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, निवड समितीच्या एका गटाला टी20 संघात बदल हवे आहेत. गेल्या वर्षभरात सूर्यकुमार यादवची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही आणि आयपीएलमध्येही त्याला लय परत मिळवता आलेला नाही. त्यामुळे त्याचं कर्णधारपद जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. पण त्याची कर्णधारपदावरून गच्छंती करणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंबीर सूर्यकुमार यादवच्या पाठिमागे ठामपणे उभा असल्याचं बोललं जात आहे.
आयपीएल 2026 स्पर्धेतील 12 डावात सूर्यकुमार यादवने फक्त 210 धावा केल्या. खरं तर सूर्यकुमार यादवकडून फार अपेक्षा होत्या. पण झालं नाही. उलट एकाच ठिकाणी तशाच पद्धतीचा फटका मारून बाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्याची कमकुवत बाजू अधोरेखित झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे संघ व्यवस्थापन भविष्यातील योजगांना गंभीरपणे विचार करत आहे. दुसरीकडे, संघाच्या वातावरणासाठी प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील चांगले संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे गौतम गंभीरचं म्हणणं टाळता येणार नाही. आता गौतम गंभीरचं म्हणणं काय आहे यावर सर्वकाही अवलंबून आहे. याचा सरळ अर्थ असा की सूर्यकुमारच्या भविष्याचा अंतिम निर्णय गंभीरचाच असेल.
सूर्यकुमार यादवने कर्णधारपद सोडले किंवा त्याला या पदावरून पायउतार व्हावं लागलं तर टीम इंडियाकडे काय पर्याय असतील. तसं पाहिलं तर टी20 संघासाठी बरेच पर्याय आहे. पहिला पर्याय म्हणजे शुबमन गिल असणार आहे. कारण तिन्ही संघांसाठी एकच कर्णधार ठेवता येईल. आता वनडे आणि कसोटी संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत त्याने संयमी आणि गरजेवेळी आक्रमक खेळी केली आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर या शर्यतीत आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत त्याचे नेतृत्व गुण दाखवून दिले आहेत. या दोघांमध्ये आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे तिलक वर्माचं आहे. पण त्याच्याकडे काहीच अनुभव नाही. त्यामुळे शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या नावाचा विचार केला जाईल.