आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत आता फक्त चार संघ आहेत. साखळी फेरीचा थरार संपला असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहे. आता या चार पैकी जेतेपदाला कोण गवसणी घालणार याची उत्सुकता आहे. 31 मे रोजी अंतिम फेरीत चषक कोण उचलणार? याबाबत मनात काहूर उठलं आहे. असं असताना जेतेपदाबाबत आधीच भविष्यवाणी करण्यात आली आहे. हे भाकीत कोणत्या ज्योतिषाने नाही क्रिकेटच्या बापूने वर्तवली आहे. क्रिकेटचा बापू म्हणजेच अक्षर पटेल. त्याला क्रिकेटमध्ये बापू या नावाने ओळखलं जातं. आयपीएल स्पर्धेतून आऊट झाल्यानंतर त्याच्याशी संवाद साधताना जेतेपदाबाबत विचारलं गेलं होतं. तेव्हा त्याने उत्तर दिलं आणि कारणही सांगितलं.
काय म्हणाला अक्षर पटेल?आयपीएल स्पर्धेतील शेवटचा सामना संपल्यानंतर मुरली कार्तिकने अक्षर पटेलला प्रश्न विचारला की, सर्व चार संघांविरूद्ध खेळला आहे. तुला काय वाटतं? कोणता संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे? तेव्हा अक्षर पटेलने सनरायझर्स हैदराबादचं नाव घेतलं. अक्षर पटेलने फक्त नाव घ्यायचं म्हणून घेतलं नाही तर त्या मागचं कारणही सांगून टाकलं. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद जेतेपद मिळवू शकते असं क्रीडाप्रेमींना वाटू लागलं आहे. अक्षर पटेलने सांगितलं की, टॉप थ्री जेव्हा धावा करतात तेव्हा त्यांना थांबवणं कठीण होतं. अक्षर पटेलने व्यक्त केलेल्या भाकीताला आकडेवारीचीही साथ मिळते. त्यामुळे त्याने वर्तवलेल्या भाकीताची सोशल मीडियावर चर्चा आहे.
आयपीएल स्पर्धेत असं एकदाच घडलंय?आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात टॉप 2 संघ जेतेपदापासून दूर राहिले आहेत. तसेच एलिमिनेटर फेरीतील संघाने जेतेपद मिळवलं आहे. हा संघ दुसरा तिसरा कोणी नाही तर सनरायझर्स हैदराबाद आहे. ऑरेंज आर्मीने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. 2016 साली जेतेपदाला गवसणी घातली होती. आता दहा वर्षानंतर सनरायझर्स हैदराबाद त्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? असा प्रश्न आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात जेतेपद मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आता हैदराबादला दोन विजय मिळवून अंतिम फेरी गाठायची आहे. प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे.