बॉलिवूड इंडस्ट्रीतील आदर्श जोडप्यांपैकी एक असलेल्या अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेते आशुतोष राणा यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. या दोघांनी त्यांच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस अत्यंत खास अंदाजात साजरा केला आहे. रेणुका आणि आशुतोष यांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातल्या आहेत.
या लग्नात त्यांची मुलं आणि मित्रपरिवारसुद्धा उपस्थित होते. पूजा आणि पारंपरिक विधी पूर्ण करत त्यांनी हा लग्नाचा वाढदिवस अविस्मरणीय बनवला. या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आशुतोष राणा यांनी इन्स्टाग्रामवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आनंदाने परिपूर्ण अशी वेळ खूप लवकर निघून जाते आणि ही वेळ कशी निघून जाते, ते कळतच नाही, असं त्यांनी लिहिलंय.
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, ‘आज माझ्या आणि रेणुकाच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत, पण असं वाटतंय की ही जणू कालचीच गोष्ट आहे. पत्नी रेणुकाच्या सहवासातील गेल्या 25 वर्षांच्या अनुभवांवर आधारित मी हे ठामपणे सांगतो की लग्नाचा उद्देश एकमेकांचं व्यक्तिमत्त्व बदलणं हा नसून, उलट ते अधिक समृद्ध आणि परिपक्व करणं हा असतो. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीमध्ये केवळ प्रेमच नव्हे तर परस्पर आदर असणंही अत्यंत आवश्यक आहे. विवाह ही एकमेकांच्या मुक्तीला आणि विकासाला साहाय्य करते.’
‘अर्ध जग तुझं आहे आणि अर्ध माझं, तरीही जर तू जोखीम पत्करण्याची कला आत्मसात केलीस, तर हे संपूर्ण जगच तुझं होऊन जाईल, या गोष्टीची जाणीव विवाह पती आणि पत्नीला करून देते. ज्या स्थानी दोन नद्या एकमेकांना भेटतात, जिथे त्यांचा संगम होतो, त्या स्थानाला पवित्र तीर्थ मानलं जातं. तसंच वर्णाश्रम व्यवस्थेत गृहस्थाश्रमसुद्धा तीर्थाप्रमाणेच असतं. कारण लग्नानंतर दोन भिन्न चेतना अग्निला साक्ष मानून एकमेकांसाठी कायमचे अभिवाज्य बनतात’, अशा सुंदर शब्दांत त्यांनी लग्नाची संकल्पना मांडली.
आशुतोष राणा आणि रेणुका यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वांत मजबूत आणि लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. या दोघांचं नात अजूनही प्रेम आणि आदरने परिपूर्ण असल्याचं या फोटोंमधून सहज स्पष्ट होतंय. आशुतोष यांच्या या फोटोंवर इंडस्ट्रीतल्या कलाकारांनी आणि चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
या दोघांनी 25 मे 2001 रोजी लग्न केलं होतं. मध्य प्रदेशच्या दमोह याठिकाणी त्यांनी छोटेखानी समारंभात लग्नगाठ बांधली होती. या लग्नाला त्यावेळी मोजकेत पाहुणे आणि कुटुंबीय उपस्थित होते. त्यामुळे लग्नाच्या 25 व्या वाढदिवशी त्यांनी पुन्हा एकदा तेच क्षण नव्याने जगण्याचा निर्णय घेतला.