माझ्यावरही बंदी घातली होती; रणवीर सिंहच्या वादावर प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा
Tv9 Marathi May 27, 2026 08:45 PM

बॉलिवूडच अभिनेता रणवीर सिंह सध्या एका नव्या वादात सापडला आहे. अलीकडेच ‘डॉन ३’ (Don 3) चित्रपटातून रणवीर सिंह बाहेर पडल्यानंतर, अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर याने FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज) शी संपर्क साधला. त्यानंतर FWICE ने रणवीर सिंह विरोधात ‘नॉन-कोऑपरेशन’ (असहकार) आदेश जारी केला. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी यावर पक्षपाताचा आरोप केला आहे. दरम्यान, FWICE ने एखाद्या कलाकारावर अशा प्रकारची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच वादाच्या पार्श्वभूमीवर, अभिनेते चंकी पांडे यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक किस्सा शेअर केला आहे.

चंकी पांडे यांनी सांगितला जुना किस्सा

ई-टाइम्स (E-Times) शी बोलताना चंकी पांडे यांनी सांगितले की, १९८७ मध्ये जेव्हा त्यांच्या ‘आग ही आग’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा चित्रपटसृष्टीत संप पुकारण्यात आला होता आणि शूटिंगला परवानगी नव्हती. तरीही, निर्माते पहलाज निहलानी यांनी बंगळुरूमध्ये शूटिंग सुरू ठेवले आणि त्यानंतर ऊटीमध्येही शूटिंग पार पडले. या नियमांच्या उल्लंघनामुळे त्यावेळी अनेकांवर कारवाई करण्यात आली होती.

एका आठवड्यासाठी घातली होती बंदी

याविषयी अधिक माहिती देताना चंकी पांडे म्हणाले, “त्या चित्रपटात धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते. ते इतके मोठे सुपरस्टार होते आणि एकाच वेळी ३०-४० चित्रपटांमध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालणे शक्य नव्हते. मी मात्र त्यावेळी नवीन होतो, माझा पहिला चित्रपटही प्रदर्शित झाला नव्हता. त्यामुळे माझ्यावर एका आठवड्यासाठी बंदी घालण्यात आली. नंतर मी माफी मागितली आणि एका आठवड्याच्या आत ती बंदी उठवण्यात आली. आपली इंडस्ट्री खूप छोटी आणि नाजूक आहे, आणि मी स्वतः या सर्व गोष्टी अनुभवल्या आहेत.”

रणवीर सिंहच्या टीमने जारी केले निवेदन

फरहान अख्तरने FWICE शी संवाद साधल्यानंतर, त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन रणवीर सिंह विरोधात असहकार आदेश जारी केला आणि त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला. या सर्व प्रकारानंतर, रणवीर सिंहच्या टीमनेही एक निवेदन जारी केले. त्यामध्ये म्हटले आहे की, रणवीर सिंह चित्रपटसृष्टी आणि ‘डॉन’ फ्रँचायझीशी संबंधित सर्व लोकांचा खूप आदर करतो. चित्रपटाच्या संदर्भात ज्या काही गोष्टी समोर आल्या आहेत, त्यावर रणवीरने मौन बाळगणेच योग्य मानले आहे. कारण त्याचे असे मत आहे की, व्यावसायिक आणि खाजगी प्रकरणे अत्यंत आदराने आणि समजूतदारपणे हाताळायला हवीत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.