आयपीएल 2026 स्पर्धेच्या एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि राजस्थान रॉयल्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 8 षटकात 125 धावांची भागीदारी केली. म्हणजेच अर्धी लढाई या जोडीने मारली होती. एकट्या वैभव सूर्यवंशीने या खेळीत 29 चेंडूत 97 धावा ठोकल्या. यावरून वैभव सूर्यवंशीने या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांची काय स्थिती केली याचा अंदाज येतो. त्याची फटकेबाजी सुरू असताना सनरायझर्स हैदराबादचे चाहते मैदानात गप्प होते. यात संघ मालकीन काव्या मारनही गप्प बसली होती. कारण पहिल्या डावातच हातातून सामना गेल्याचं स्पष्ट दिसत होतं. प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीची विकेट काढली. त्यामुळे वैभवचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. त्यामुळे वैभव खूपच नाराज झाला होता.
वैभव सूर्यवंशीचं शतक हुकल्यानंतर खिन्न मनाने पॅव्हेलियनकडे जात होता. तेव्हा त्याच्या खेळीचं कौतुक मैदानात उपस्थित असलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनीही केलं. यात अभिषेक शर्माही होता. पण काव्या मारन स्टँडमध्ये बसून होती. तिचं वागणं पाहून क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण काव्या मारन आपल्या सीटवर बसून चेहरा पाडून टाळ्या वाजवत होती. तिचं असं वागणं पाहून क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. क्रीडाप्रेमींच्या मते, काव्या मारन यांनी उभं राहून टाळ्या वाजवून त्याच्या खेळीचा सन्मान करायला हवा होता. काव्या मारनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वैभव सूर्यवंशीने पहिल्या षटकात षटकार मारून आपला हेतू स्पष्ट केला होता. त्यानंतर त्याने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतरही त्याचा झंझावात सुरू होता. 28 चेंडूत तो 97 धावांपर्यंत पोहोचला. पण 29व्या चेंडूवर फटका मारताना चूक झाली आणि झेल बाद झाला. त्याचं शतक आणि एक मोठा विक्रम 3 धावांनी हुकला. ख्रिस गेलने 2013 मध्ये फक्त 30 चेंडूत शतक ठोकलं होतं. जर 29व्या चेंडूवर चौकार किंवा षटकार बसला असता मोठा विक्रम मोडला असता. पण तसं झालं नाही. पण इतर काही विक्रम त्याने मोडीत काढले.