आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात चर्चेत नाव कोणाचं असेल तर ते 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं.. या खेळाडूने स्पर्धेत नवा पायंडा पाडला आहे. तसेच अनेक विक्रम धडाधड मोडत सुटला आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काल परवापर्यंत वैभवच्या फलंदाजीबाबत बोटं मोडणारेही आता त्याची स्तुती करताना दिसत आहेत. कारण वैभवची सातत्यपूर्ण कामगिरी सुरू आहे. त्यामुळे त्याच्या क्षमतेवर बोटं दाखवण्याची जागाच शिल्लक नाही. असं असताना माजी क्रिकेटपटू आर अश्विनने वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून एक विधान केलं आहे. वैभव सूर्यवंशी पर्यावरणासाठी घातक असल्याचं सांगितलं आहे. असं सांगण्याचं कारणंही आहे. वैभव सूर्यवंशी चेंडूवर आक्रमक प्रहार करतो आणि निर्धाव चेंडू सोडत नाही. त्यामुळे ग्रीन डॉट होत नाही आणि पर्यावरणाचं नुकसान होतं. कारण प्रत्येक निर्धाव चेंडूवर बीसीसीआय झाडं लावते.
आर अश्विनने मजेशीर अंदाजात सांगितलं की, वैभव सूर्यवंशी पर्यावरणासाठी चांगला नाही कारण तो डॉट बॉल देत नाही. बीसीसीआयने आयपीएलमध्ये डॉट बॉलसंदर्भात एक विशेष मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक डॉट बॉलवर बीसीसीआय आणि आयपीएलचे टायटल स्पॉन्स टाटा मिळून देशाच्या विविध भागात शेकडो झाडं लावतात. बीसीसीआय या माध्यमातून पर्यावरणविषयक जनजागृती करत आहे. वैभव सूर्यवंशीसारखे फलंदाज चौकार आणि षटकार मारत सुटले तर निर्धाव चेंडू कमी होती आणि त्या तुलनेच कमी झाडं लावली जातील. हाच धागा पकडून आर अश्विनने विनोदी भाष्य केलं.
वैभव सूर्यवंशी मोठा विक्रम रचता रचता राहिला. 29व्या चेंडूवर विकेट पडली नसती आणि शतक पूर्ण झालं असतं तर त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला असता. आतापर्यंत हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 30 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. तर वैभव सूर्यवंशीने 28 चेंडूत 97 धावा केल्या आणि 29व्या चेंडूवर विकेट पडली. असं असलं तरी त्याने ख्रिस गेलच्या 59 षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे. वैभव सूर्यवंशीने 243 च्या स्ट्राईक रेटने 680 धावा केल्या आहेत. यात 65 षटकार मारले आहेत. तर एक शतक झळकावलं आहे.