GT vs RR : क्वालिफायर 2 रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कुणाला? जाणून घ्या
Tv9 Marathi May 28, 2026 09:45 PM

आयपीएल स्पर्धेचा 19 वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आहे. गतविजेत्या बंगळुरुने गुजरातला पराभूत करुन अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. तर राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवून क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली. आता अंतिम फेरीतील दुसरा संघ कोणता असणार? हे क्वालिफायर 2 सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल. क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात विरुद्ध राजस्थान आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला स्पर्धेतून बाहेर होण्यासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागणार आहे.

राजस्थान रॉयल्सने स्पर्धेच्या पहिल्या मोसमात आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. मात्र त्यानंतर राजस्थानची ट्रॉफीची प्रतिक्षा कायम आहे. यंदा राजस्थानला चॅम्पियन्स होण्याची संधी आहे. तर गुजरातचा क्वालिफायर 1 मधील चुका सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या सामन्यात चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाला तर? सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण जाणून घेऊयात.

फायनलचं तिकीट कुणाला?

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अंतिम सामना हा 31 मे रोजी होणार आहे. या सामन्यात बंगळुरुसमोर गुजरात किंवा राजस्थानपैकी एका संघाचं आव्हान असणार आहे. त्याआधी 29 मे रोजी क्वालिफायर 2 चा थरार रंगणार आहे. क्वालिफायर 2 साठी कोणत्याही राखीव दिवसाची तरतूद नाही. त्यामुळे आयपीएलच्या नियमांद्वारे अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? हे निश्चित केलं जाईल.

असा ठरणार दुसरा फायनलिस्ट

कोणत्याही कारणामुळे क्वालिफायर 2 सामन्यात एकही चेंडूचा खेळ न झाल्यास अंपायर सुपर ओव्हरद्वारे निकाल लावण्याचा प्रयत्न करतील. मात्र परिस्थितीमुळे सुपर ओव्हरही न झाल्यास साखळी फेरीतील पॉइंट्स टेबलच्या आधारे अंतिम फेरीतील दुसरा संघ निश्चित करावा लागेल. त्यामुळे गुजरात फायनलमध्ये पोहचणारी दुसरी टीम ठरेल. साखळी फेरीत गुजरातने आपला प्रवास दुसऱ्या स्थानी संपवलेला. तर राजस्थान प्लेऑफसाठी क्वालिफायर करणारी चौथी आणि शेवटची टीम ठरली होती. त्यामुळे गुजरातला फायनलचं तिकीट मिळेल.

सामन्याच्या दिवशी हवामान कसं?

क्वालिफायर 2 सामन्याच्या दिवशी अर्थात 29 मे रोजी हवामान कसं असणार? याबाबत हवामान खात्याने काय सांगितलंय? जाणून घेऊयात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 28 ते 29 मे च्या सकाळपर्यंत चंडीगड आणि आसपासच्या परिसरात गारा पडू शकतात. त्यामुळे हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर शुक्रवारी संपूर्ण दिवशी आकाश निरभ्र राहिल. तसेच पावसामुळे सामन्यात व्यत्यय येणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.