प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा भट्ट एकेकाळी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. 1990 च्या दशकात तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मात्र नंतर तिने स्वत:ला लाइमलाइट आणि कॅमेऱ्यापासून दूर केलं. पूजाने दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केला. त्याचवेळी तिची भेट मनिष मखिजाशी झाली होती. 2003 मध्ये या दोघांनी खासगी समारंभात लग्न केलं. मात्र लग्नाच्या अकरा वर्षांनंतर 2014 मध्ये ते विभक्त झाले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा भट्ट तिच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पूजाने लग्नाच्या अकरा वर्षांनंतर मनिषला घटस्फोट देण्यामागचं कारण सांगितलं.
विकी लालवानीच्या पॉडकास्ट मुलाखतीत पूजा भट्टने सांगितलं, “मला माझ्याच वैवाहिक आयुष्यात एकटेपणा जाणवू लागला होता. माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी मला विचारलं की, तुझं लग्न 11 वर्षे टिकलं, मग अचानक तू का नातं संपवलंस? तुझ्या आयुष्यात कोणी दुसरं होतं का? तर त्याचं उत्तर होतं की नाही. माझ्या आयुष्या दुसरं कोणीच नव्हतं. मी दुसऱ्या कोणाचा विचारसुद्धा करत नव्हते. पण मला माझ्याच नात्यात एकटेपणा जाणवत होता. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत असूनही एकटेपणा अनुभवत असाल, तेव्हा हे समजून घ्या की ते नातं पूर्वीसारखं राहिलेलं नाही. एकाच घरात राहूनही तुम्ही हळूहळू एकमेकांपासून दूर जाता आणि मग ते नातं फिकं पडू लागतं. त्यातील ओलावा हरपून जातो.”
“मी त्याला स्पष्ट सांगितलं की आपलं नातं मैत्री आणि विश्वासाच्या आधारावर सुरू झालं होतं. तू जे काही सांगायचास ते मी कधीच तपासून पाहिलं नाही आणि भविष्यातही कधी तपासणार नाही. पण मला जाणवू लागलं होतं की हे नातं आता संपलं आहे. आम्ही एकमेकांपासून दुरावलो होतो आणि या प्रवासात कुठेतरी एक स्त्री म्हणून मी स्वत:ला हरवून बसले होते. मला माझी ओळख आणि स्वत:चं अस्तित्व पुन्हा मिळवायचं होतं. त्यामुळे हे लग्न पुढे चालू ठेवणं खोटेपणाचं ठरलं असतं. मी आयुष्य खोट्यावर जगू शकत नाही. मला माझ्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहायचं नाही. पण माझ्या दु:खासाठी मी कोणालाही दोष देणार नाही”, असं पूजाने स्पष्ट केलं.
पूजाने या मुलाखतीत असंही सांगितलं की ती अशा जोडीदाराच्या शोधात आहे, ज्याच्यासोबत ती तिचं आयुष्य आनंदाने घालवू शकेल. पण जरी असा कोणी भेटला नाही, तरी ती दु:खी नाही. पूजाने तिच्या वैवाहिक आयुष्यातील आणखी एका समस्येचाही खुलासा केला. “आमचा संसार सुखाचा होत नव्हता आणि त्यामागील एक कारण म्हणजे मला मूल नको होतं. मला लहान मुलं आवडतात, पण मला आई व्हायची इच्छा कधीच झाली नाही. माझ्या तिशीत मी सतत काम करत होते आणि माझ्या आयुष्यात अनेक ध्येये, कामं होती जी मला पूर्ण करायची होती. पण आई होण्याची भावना किंवा इच्छा माझ्या मनात कधीच आली नाही. म्हणून मी माझ्या मनाचं आणि भावनांचं ऐकलं”, असं ती पुढे म्हणाली.