अधिक मास पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करून दाखवा हा खास नैवेद्य
Webdunia Marathi May 31, 2026 02:45 PM

अधिक मास पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना ३३ अनरशांचा किंवा ३३ मालपुआ नैवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. भगवान विष्णूंना गोड आणि दुधाचे पदार्थ अत्यंत प्रिय आहे. जर तुम्हाला या पौर्णिमेला झटपट आणि पारंपारिक पद्धतीने विष्णू चरणी नैवेद्य अर्पण करायचा असेल, तर 'रबडी मालपुआ' हा सर्वोत्तम पर्याय आहे. ३३ मालपुए बनवून देवाचा विशेष नैवेद्य कसा तयार करायचा, याची सोपी पाककृती आज आपण पाहणार आहोत. 

 

साहित्य-

१ कप मैदा किंवा गव्हाचे पीठ), १/२ कप रवा (बारीक), १ कप कोमट दूध, २ चमचे दुधाची साय किंवा मावा (खवा), १ चमचा बडीशेप पावडर.

 

पाक बनवण्यासाठी: १ कप साखर, १ कप पाणी, ४-५ केशर पाकळ्या, १/२ चमचा वेलची पावडर. मालपुआ तळण्यासाठी साजूक तूप आणि सजावटीसाठी पिस्त्याचे काप.

 

कृती- 

मालपुआचे पीठ तयार करणे: एका मोठ्या भांड्यात मैदा, रवा आणि बडीशेप पावडर एकत्र करा. त्यात साय किंवा मावा घालून मिक्स करा. आता थोडे थोडे कोमट दूध घालत चमच्याने व्यवस्थित ढवळा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावे. हे मिश्रण २० मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून रवा छान फुलेल.

 

साखरेचा पाक बनवणे:

गॅसवर एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र उकळत ठेवा.पाण्याला उकळी आल्यावर त्यात केशर आणि वेलची पावडर घाला. आपल्याला तार असलेला पाक बनवायचा नाहीये, फक्त गुलाबजामच्या पाकासारखा हाताला चिकट लागेल असा ५-७ मिनिटे उकळवून हलका घट्ट पाक तयार करा आणि गॅस बंद करा. तसेच देवाच्या नैवेद्यासाठी साजूक तुपाचा वापर आवर्जून करा. एका सपाट तळ असलेल्या पॅनमध्ये तूप गरम करा. तूप मध्यम गरम झाल्यावर चमचाभर पीठ पॅनच्या मधोमध ओता. मंद ते मध्यम आचेवर मालपुआ दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी आणि कडेने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तळलेला गरमागरम मालपुआ तूप निथळून थेट कोमट साखरेच्या पाकात टाका. मालपुआ पाकात फक्त २ ते ३ मिनिटेच ठेवावा, जेणेकरून तो पाक शोषून घेईल आणि मऊ होईल. त्यानंतर तो पाकातून बाहेर काढावा.

ALSO READ: अधिकमासात जावयाला वाण का देतात? जाणून घ्या जाळीदार अनारशांची परफेक्ट रेसिपी आणि ३३ संख्येचे महत्त्व!

नैवेद्य कसा अर्पण करावा? (महत्वाचे नियम):

३३ ची संख्या: अधिक मासाचे पुण्य मिळवण्यासाठी एका ताशाच्या किंवा चांदीच्या ताटात ३३ मालपुआ रचून ठेवावेत.

 

तुळशीचे पान: भगवान विष्णूंच्या नैवेद्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीचे पान. नैवेद्याच्या ताटावर तुळशीचे पान ठेवल्याशिवाय विष्णू नैवेद्य ग्रहीत धरत नाहीत.

 

साजूक तूप आणि सुकामेवा: वरून पिस्त्याचे काप पसरवून आणि थोडे साजूक तूप सोडून हा नैवेद्य देवापुढे अर्पण करावा.

 

हा नैवेद्य दाखवताना "ॐ नमो भगवते वासुदेवाय" या मंत्राचा उच्चार करावा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ALSO READ: शाही रोझ पिस्ता बर्फी बनवून अधिक महिन्यात जावयाला द्या खास वाण

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: जावईबापू खुश होतील! अधिक मास पौर्णिमेसाठी खास पारंपरिक थाळीचा बेत! पाहा पदार्थांची यादी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.