आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची यशस्वीरित्या सांगता झाली. साखळी फेरीतील 70 आणि प्लेऑफमधील 4 अशा एकूण 74 सामन्यांनंतर 19 व्या मोसमातील विजेता निश्चित झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी 31 मे रोजी गुजरात टायटन्सवर एकतर्फी फरकाने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. गुजरातने आरसीबीला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान विराट कोहली याने केलेल्या नॉट आऊट 75 रन्सच्या जोरावर एकतर्फी फरकाने पूर्ण करत विजय मिळवला. आरसीबीने 5 विकेट्सने महाअंतिम सामना जिंकला. या सामन्यासह ऑरेंज कॅप विजेताही निश्चित झाला.
ऑरेंज कॅपसाठी अंतिम सामन्यापर्यंत चढाओढ होती. वैभव सूर्यवंशी, साई सुदर्शन आणि शुबमन गिल या तिघांमध्ये रस्सीखेच होती. मात्र गुजरातचे सलामी फलंदाज साई आणि शुबमन स्वस्तात आऊट झाले. यासह वैभव ऑरेंज कॅप विजेता म्हणून निश्चित झाला.
शुबमन आणि साई या दोघांनी अंतिम सामन्याआधी अपवाद वगळता जबरदस्त कामगिरी केली. साईने अंतिम सामन्याआधी 710 धावा केल्या होत्या. तर शुबमनने 722 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र दोघे अंतिम सामन्यात अपयशी ठरले. शुबमनने 10 धावा केल्या. तर साईने शुबमनपेक्षा 2 जास्त धावा केल्या. त्यामुळे शुबमन 19 व्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा दुसरा आणि साई तिसरा फलंदाज ठरला. शुबमनने 16 सामन्यांत एकूण 732 धावा केल्या. तर साई 17 सामन्यांत 722 धावा करण्यात यशस्वी ठरला.
शुबमनच्या वैभवच्या तुलनेत ऑरेंज कॅपपासून अवघ्या 44 धावांनी दूर राहिला. त्यामुळे वैभवला ऑरेंज कॅप पटकावण्यात यश आलं. वैभवने 16 सामन्यांत सर्वाधिक 776 धावा केल्या. वैभवने या दरम्यान 1 शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली. वैभवने 48.50 च्या सरासरीने आणि 237.31 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. वैभवने या मोसमात चौकारांपेक्षा जास्त षटकार लगावले. वैभवने या मोसमात सर्वाधिक 72 षटकार लगावले. तर 63 चौकारही खेचले.
वैभव सूर्यवंशीने पटकावली ऑरेंज कॅप
दरम्यान गुजरातला पराभवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. तर राजस्थान रॉयल्सचं क्वालिफायर 2 मध्ये आव्हान संपुष्ठात आलं. त्यामुळे राजस्थान तिसऱ्या स्थानी राहिली. राजस्थानला क्वालिफायर 2 पर्यंत पोहचवण्यात वैभव सूर्यवंशी याने बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं.