इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि कठोर परिश्रमाला कोणताही पर्याय नसतो हेच पुन्हा एकदा बिहारमधील गया येथील एका सामान्य कुटुंबातील मुलाने सिद्ध करून दाखवले आहे. आयआयटीतर्फे घेण्यात आलेल्या JEE Advanced 2026 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये गयाच्या शुभम कुमारने ३६० पैकी ३३० गुण मिळवून अखिल भारतीय स्तरावर (AIR 1) प्रथम क्रमांक पटकावला आहे. शुभमच्या या अभूतपूर्व यशामुळे त्याच्या कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाला उधाण आले असून, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शुभमने यापूर्वी JEE Main 2026 च्या जानेवारी आणि एप्रिल अशा दोन्ही सत्रांमध्ये १०० पर्सेंटाईल मिळवले होते. दोन्ही सत्रांमध्ये अशी कामगिरी करणारा तो बिहारमधील एकमेव विद्यार्थी ठरला होता. आता ‘ॲडव्हान्स्ड’मध्येही देशात अव्वल येत त्याने गुणवत्तेचा डंका वाजवला आहे.
शुभम हा अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमीतून येतो. त्याचे वडील शिव कुमार हे हार्डवेअरचे काम करून कुटुंबाचा गाडा चालवतात, तर आई कांचन देवी गृहिणी आहेत. वडिलांची मर्यादित कमाई असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कधीही कमतरता भासू दिली नाही. शुभमच्या घरात आधीपासूनच शिक्षणाचे उत्तम वातावरण आहे. त्याची मोठी बहीण, प्रिया कुमारी, ही देखील सध्या आयआयटी पाटणा (IIT Patna) येथे कॉम्प्युटर सायन्सचे उच्च शिक्षण घेत आहे. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत आता शुभमनेही यशाचे शिखर गाठले आहे.
आजच्या काळात जिथे अगदी प्राथमिक वर्गांपासूनच मुलांवर कोचिंग क्लासचा भार असतो, तिथे शुभमचा शैक्षणिक प्रवास अत्यंत वेगळा आणि प्रेरणादायी ठरला आहे. माझे प्राथमिक शिक्षण गया येथील नाझरेथ अकादमीमधून पूर्ण केले. मी कोणत्याही प्रकारची शिकवणी लावली नव्हती. ५ वी पर्यंत त्याच्या आईने त्याला अभ्यासात मार्गदर्शन केले, तर त्यानंतर त्याने स्वतःच्या हिंमतीवर अभ्यास केलाय त्याने ‘ब्रिटिश इंग्लिश स्कूल’मधून १२ वी उत्तीर्ण केली.
दरम्यान स्पर्धा परीक्षेची (JEE) तयारी अधिक सक्षमपणे करण्यासाठी शुभम गेल्या दोन वर्षांपूर्वी राजस्थानच्या कोटा येथे गेला. सुरुवातीला कोरोना काळ आणि इतर परिस्थितीमुळे त्याने ११ वीचे शिक्षण ऑनलाईन कोचिंगच्या माध्यमातून घरबसल्या पूर्ण केले. मात्र, त्याची गुणवत्ता पाहून त्याला पुढील शिक्षणासाठी १०० टक्के शिष्यवृत्ती (Scholarship) मिळाली. त्यानंतर तो कोटामध्ये ऑफलाइन वर्गात प्रवेश घेऊन अभ्यास करू लागला. कोटा येथील स्पर्धात्मक आणि अभ्यासाला पूरक असलेल्या वातावरणामुळे तयारीला मोठी गती मिळाल्याचे शुभम सांगतो.
शुभम केवळ कोचिंगवर अवलंबून राहिला नाही. क्लास व्यतिरिक्त तो दररोज न चुकता सुमारे ८ तास स्वतःहून अभ्यास (Self-study) करत असे. सातत्य आणि एकाग्रता हीच त्याच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. आता शुभमचे पुढील ध्येय देशातील आघाडीची संस्था आयआयटी मुंबई (IIT Bombay) येथून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करणे असे आहे.
आयआयटीतर्फे १७ मे रोजी दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती, ज्याचा निकाल ३१ मे रोजी अधिकृत वेबसाइट jeadv.ac.in वर जाहीर करण्यात आला. यात टॉपर्सची यादी समोर आली आहे.
यावर्षी १.८७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी १.७९ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले. निकालात १०,१०७ विद्यार्थिनींसह एकूण ५६,८८० उमेदवार पात्र ठरले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांसाठी आता JoSAA समुपदेशन (Counseling) प्रक्रिया सुरू झाली असून, आयआयटी रुरकीचे संचालक प्रा. कमल किशोर पंत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.