मुंबई : या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण 'डीप टेक परिसंस्थेसाठी' (Deep Tech Ecosystem) व्यापक धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचा अभिमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या धोरणांमुळे महाराष्ट्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडणार असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील 'वर्षा' या अधिकृत निवासस्थानी या दोन्ही महत्त्वाकांक्षी धोरणांसंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत धोरणांच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, आगामी मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीत या दोन्ही धोरणांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.
या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धोरणांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, "राज्यात संशोधन (Research), नवोन्मेष (Innovation), मोठी गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला (High-Skilled Jobs) चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मैलाचा दगड ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक आणि दूरगामी दृष्टिकोनाचाच हा एक मुख्य भाग आहे."
या दोन्ही अद्ययावत धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूक आकर्षित होणार आहे. तसेच, वैज्ञानिक संशोधन आणि नवनवीन प्रयोगांना गती मिळून तरुणांसाठी रोजगाराच्या लाखो नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे औद्योगिक क्षेत्रातही राज्याचा दबदबा आणखी वाढणार आहे.
ही बातमी वाचा: