बिग क्रिकेट लीग अर्थात बीसीएलच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात झाली आहे. ग्रेटर नोएडाच्या प्रसिद्ध शहीद विजय सिंग पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या लीगचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही फक्त मोठ्या स्टार्ससाठीची लीग नाही, तर सामान्य क्रिकेटपटूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधीही देते. जे खेळाडू अनेक वर्षे क्रिकेट खेळले आहेत पण मोठ्या व्यासपीठावर पोहोचले नाहीत, त्यांच्यासाठी बिग क्रिकेट लीग एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. लीगमध्ये एकूण सहा संघ सहभागी झाले असून, स्पर्धा अत्यंत चुरशीची आहे. बिग क्रिकेट लीग ही आता केवळ एक स्पर्धा राहिलेली नाही, तर तरुण भारताच्या स्वप्नांचे आणि जिद्दीचे प्रतीक बनली आहे.
या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यासाठी स्टेडियम खचाखच भरलं होतं. रंगीबेरंगी झेंडे, रोषणाई, स्टेजची सजावट आणि उत्साह संपूर्ण स्टेडियममध्ये पसरला होता. ढोलांचा दणदणाट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नेत्रदीपक आतषबाजीने लीगची सुरुवात दिमाखदार झाली. ही स्पर्धा पाहताना आयपीएलसारखा उत्साह निर्माण झाला होता. यूपी ब्रिज स्टार्स आणि मुंबई मरीनचे संघ मैदानात उतरले होते. तेव्हा प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि त्याचं स्वागत केलं. या संघांमध्ये शिखर धवन, श्रीशांत आणि रॉस टेलर यांसारख्या आंतरराष्ट्रीय दिग्गजांचा समावेश होता. गॅलरीतील प्रेक्षक या स्टार खेळाडूंना जवळून पाहून रोमांचित झाले होते.
बीसीएल लीगच्या सामन्याचे उद्घाटन उत्तर प्रदेश सरकारचे लोकप्रिय नेते ठाकूर रघुराज सिंह यांच्या हस्ते झाले. सरकामध्ये ते कामगार आणि रोजगार राज्यमंत्री तसेच क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री आहेत. त्यांनी स्वतः सर्व खेळाडूंची भेट घेतली, त्यांना प्रोत्साहन दिले आणि औपचारिकपणे सामन्याचे उद्घाटन केले. त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं की, “सरकार तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बिग क्रिकेट लीग ही केवळ एक क्रिकेट स्पर्धा नाही, तर ती एक संपूर्ण परिसंस्था तयार करत आहे. ती तरुणांना क्रीडा तसेच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देत आहे.”
अधिकृत मीडिया पार्टनर म्हणून टीव्ही9 च्या सहभागामुळे लीगला आणखी बळकटी मिळाली आहे. या स्पर्धेला भारतातच नव्हे, तर परदेशातही दमदार कव्हरेज मिळाले आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण, हायलाइट्स, खेळाडूंच्या मुलाखती आणि विशेष अहवाल प्रेक्षकांना घरबसल्या संपूर्ण आनंद देत आहेत.

पहिल्या पर्वातील विजेते मुंबई मरीन्स आणि यजमान संघ यूपी ब्रिज स्टार्स यांच्यातील उद्घाटन सामना रोमांचक ठरला. मुंबई मरीन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 171 धावा केल्या. तर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील यूपी ब्रिज स्टार्सने उत्कृष्ट फलंदाजी करत काही चेंडू शिल्लक असतानाच 172 धावांचे लक्ष्य गाठले. सामन्याचा थरार शेवटच्या षटकांपर्यंत कायम होता. आता सर्वांच्या नजरा आगामी सामन्यांवर आहेत. यूपी ब्रिज स्टार्स आपली विजयी घोडदौड कायम ठेवू शकतील का? की मुंबई मरीन आणि इतर संघ पुनरागमन करतील? याकडे लक्ष असेल.