आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळालं. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं. इच्छा असूनही ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशा नेत्यांनी बंडखोरी करत या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ही बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखीचा विषय ठरू शकते असं वाटत असताना, अनेक ठिकाणची बंडखोरी मोडून काढण्यात महायुतीला यश मिळालं. मात्र ज्या विधान परिषदेच्या जागेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं, तिथे मात्र महायुतीला मोठा धक्का बसला आहे.
नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे. नाशिकमधून नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. परंतु जागा वाटप होण्याच्या आधीच भाजपच्या वतीने गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर दुसरीकडे त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान गीते बंधू यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घ्यावेत यासाठी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे यांचे प्रयत्न सुरू होते. अर्ज माघे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
परंतु गोकुळ गीते ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्यांनी शेवटच्या दिवशी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने आता नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठं ट्विस्ट निर्माण झालं असून, ही लढत आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दराडे आणि गीते यांच्यामध्ये होणार आहे. नरेंद्र दराडे यांच्यासमोर गोकुळे गीतेच्या रुपानं मोठं आवाहान निर्माण झालं आहे. गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले मात्र तरी देखील गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत.