Abdul Sattar Vs Atul Save : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीचा धूम आहे. एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झालेली पाहायला मिळत आहे. एकूण सहा जागा या बिनविरोध होत आहेत. यात यवतमाळ, पुणे, रायगड, चंद्रपूर, अहिल्यानगर, ठाणे यांचा समावेश आहे. तर नाशिकमधून गोकुळ गीता यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नसून महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. याच निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी शिवसेनेचे नेते तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भाजपाचे नेते तथा मंत्री अतुल सावे आणि अब्दुल सत्तार यांच्यात चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला. आता समीर सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. परंतु आता विधानपरिषदेच्या निवडणुकीतील संघर्ष संपलेला असतानाच आता संभाजीनगरात सावे आणि सत्तार यांच्यात नव्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा असाच संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीसाठी अतुल सावे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मंत्री अतुल सावे यांनीही अर्ज दाखल केला आहे. याच निवडणुकीसाठी अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार हेदेखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता सत्तार विरुद्ध सावे असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी सत्तार यांनी आपली भूमिकादेखील स्पष्ट केली आहे.
त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत बेबनावमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन हा अर्ज दाखल केला आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भााजप यांची युती आहे. परंतु शिवसेनेच्या नेत्यांना वगळून भाजपने जिल्हा बँकेसाठी आपला अर्ज भरला आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत बेबनाव निर्माण झाला आहे, असे म्हटले जात आहे. यावरही सत्तार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत माझ्या परिवारातील कोणीही बँकेचा संचालक होणार नाही. विधानपरिषदेसाठी कोणीही उमेदवारी अर्ज भरू शकत होतं. माझ्या मुलाला उभं करायचं असतं तर मी पक्षाकडे उमेदवारी मागितले असती, असं सत्तार विधानपरिषदेच्या निवडणुकीवर बोलताना म्हणाले.
मी भाजपवर टीका केली म्हणून…तसेच, त्यांनी जिल्हा बँकेचा कारभार आणि या बँकेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. माहितीच्या अधिकाराखाली काढा काय वाटोळं झालं ते जाणून घ्या. या निवडणुकीसाठी त्यांनी युती केली तर आम्ही युतीला तयार आहोत. युती नाही केली तर आम्हाला शेवटी निवडणूक लढवावी लागेल, अशी थेट भूमिका सत्तार यांनी घेतली. तसेच आमचे सहा आमदार एक खासदार आहे. भाजप युती करत असेल तर त्यांच्यासोबत बोला, असं आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे. मी भाजपवर टीका केली म्हणून एवढी चर्चा झाली, वाचा फुटली. जर बँकेत दगा फटका झाला तर आमची तयारी आहे, असेही सत्तार यांनी सांगितले.
कनाथ शिंदे साहेबांनी….मी पहिल्या वीस वर्षापासून बँकेचा संचालक आहे. आता मी तिथे राहू शकत नाही. आता सरकारने नवीन कायदा बनवला आहे. जो दहा वर्षे संचालक राहील त्याला नवीन फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे आता माझ्या जागेवर समीर उभा रहात आहे. आता राहिला बँकेचा प्रश्न तर माझ्या मुलाला बँकेचा चेअरमन, व्हाईस चेअरमन काहीही व्हायचं नाह, असे सत्तार यांनी स्पष्ट केले. पुढचं कोणाला वाटत असेल आमचा आता चेअरमन पदावर डोळा आहे. तर तसं नाहीये. माझ्या तालुक्याचे चेअरमन यापूर्वीही होते. एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या खासदारांवर जबाबदारी टाकली आहे. भाजपात अतुल सावे यांच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे ते दोघे बसतील आणि पुढची रूपरेषा ठरेल, अशी माहितीही सत्तार यांनी दिली. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत विजय हवा असेल तर भविष्यात सावे यांना सत्तार यांची मनधरणी करावी लागेल. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.