Chanakya Niti : या 3 ठिकाणी कधीच पैसे खर्च करू नका, आयुष्यभर सुखी राहाल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
Tv9 Marathi June 05, 2026 12:45 AM

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत होते, तसेच ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आज देखील दैनंदिन आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. चाणक्य हे एक मोठे अर्थतज्ज्ञ होते. त्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यात आर्थिक नियोजन कसं करावं? याबद्दल त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात पैसा ही फार मोठी गोष्ट असते, जेव्हा तुमच्या हातात पैसा असतो, तेव्हा संपूर्ण जग तुमचं असतं. ज्या दिवशी तुमच्याकडचा पैसा संपतो, तेव्हा मात्र आपलेही परके बनतात. नातेवाईक देखील तुम्हाला ओळख दाखवत नाहीत. त्यामुळे संकटकाळासाठी पैसा वाचवलाच पाहिजे. जर तुम्ही 100 रुपये कमावत असाल तर त्यातील 25 रुपयांची बचत केली पाहिजे. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्यावर कोणतंही संकट येऊ शकत नाही, कारण बहुतांश संकट ही आर्थिक बाबीशी निगडीत असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य पुढे असं देखील म्हणतात की अशा तीन गोष्टी आहेत, ज्यावर माणसाने कधीही पैसा खर्च केला नाही पाहिजे, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

दिखावूपणा – चाणक्य म्हणतात काही लोकांना दिखावूपणा करण्याची सवय असते, आपण किती श्रीमंत आहोत? हे समाजाला त्यांना दाखवायचं असतं. त्यामुळे समाजावर छाप पाडण्यासाठी असे लोक अंगावर दाग दागिने घालतात, महागाचे कपडे खरेदी करतात. तसेच घरामध्ये अनावश्यक वस्तू देखील खरेदी करतात. लोकांवर छाप पाडण्याच्या नादात असे लोक आपल्या उत्पन्नापेक्षाही जास्त खर्च करतात. त्यामुळे असे लोक नंतर मोठ्या संकटात सापडतात. त्यामुळे असा खर्च टाळला पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मित्र नातेवाईकांवर खर्च – चाणक्य म्हणतात अनेकजण आपल्या मित्र नातेवाईकांवर प्रचंड खर्च करतात. मित्र किंवा नातेवाईकांना अडअडचणीच्या काळात मदत करणं हे काही वाईट नाही. परंतु तुमच्या मित्र आणि नातेवाईकांमध्ये असे देखील काही लोक असतात, जे अत्यंत स्वार्थी असतात. अशा लोकांना वेळीच ओळखता आलं पाहिजे, अशा लोकांवर एकही रुपया खर्च करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

जुगार – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला जुगाराचा नाद असतो, तो व्यक्ती स्वत: तर बरबाद होतोच, परंतु तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला देखील उद्ध्वस्त करतो. त्यामुळे जुगारापासून नेहमी दूर राहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.