भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून सुरू होणार आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नाही. त्यामुळे या सामन्याला फक्त एक सामना म्हणून महत्त्व आहे. असं असताना या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात बऱ्याच उलथापालथी घडल्या आहेत. बीसीसीआयने गेल्या महिन्यात अफगाणिस्तान कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. पंतचा संघात समावेश करण्यात आला, पण त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले. कसोटी क्रिकेटमध्ये मागच्या वर्षीच भारतीय संघाचं उपकर्णधारपद ऋषभ पंतच्या खांद्यावर दिलं होतं. पण आता ते काढून केएल राहुलकडे सोपवण्यात आलं आहे. आयपीएल स्पर्धा सुरू असताना घडलेल्या घडामोडीनंतर ऋषभ पंत नाराज असल्याचं बोललं जात आहे.
काय म्हणाले प्रशिक्षक?टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी भाष्य केलं आहे. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट म्हणाले की, “नेता बनण्यासाठी औपचारिक पदाची गरज नसते. पंतने सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळावे आणि योग्य निर्णय घ्यावेत, अशी आमची इच्छा आहे.” इतकंच काय तर पुढे त्यांनी स्पष्ट केलं की, ‘उपकर्णधारपदावरून हटवल्याबद्दल पंतने कोणतीही तक्रार केलेली नाही. पंतची आतापर्यंतची कसोटी कारकीर्द शानदार राहिली आहे.’
ऋषभ पंतचं उपकर्णधारपद काढून घेतलं खरं पण आता त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल का? असाही प्रश्न आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात सुमार कामगिरी राहिली तर पुढच्या कसोटी मालिकेत त्याच्यावर बेंचवर बसण्याची वेळ येईल. कारण केएल राहुल हा विकेटकीपर फलंदाज आहे. त्यामुळे त्याची जागा भरून काढण्यासाठी पर्याय आहे. त्यात केएल राहुल उपकर्णधार असल्याने प्लेइंग 11 चा भाग असेल, असं गृहीत धरलं जातं. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला संधी मिळाली तर त्याला स्वत:ला सिद्ध करून दाखवावं लागेल.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचं नेतृत्व ऋषभ पंतने केलं होतं. या सामन्यात पराभवाला सामोर जावं लागलं. भारताने हा सामना 408 धावांनी गमावला होता. या सामन्यातील पहिल्या डावात ऋषभ पंतने 7, तर दुसऱ्या डावात 13 धावांची खेळी करून बाद झाला होता. त्यामुळे भारताचा 2-0 ने पराभव झाला.