Mumbai Mangroves Destruction : मुंबईच्या विस्तीर्ण किनारपट्टी आणि खाडीलगत आढळणारी खारफुटीची जमीन, म्हणजेच 'कांदळवन' (Mangroves) सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. मुंबईला अरबी समुद्राच्या उधाणापासून आणि पुरापासून वाचवण्यासाठी हे कांदळवन नेहमीच एक मजबूत 'ढाल' म्हणून उभं राहिलं आहे. मात्र, दुर्दैवाने हाच निसर्गाचा हिरवा पट्टा आता विविध पायाभूत विकासकामांच्या मार्गातील मोठा अडथळा बनू लागला आहे. आज 'पर्यावरण दिना'चे (Environment Day) औचित्य साधून पर्यावरणवादी आणि तज्ज्ञांनी मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे, कारण हव्यासापोटी मुंबईला मिळालेले हे नैसर्गिक वरदान लवकरच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्राला तब्बल 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. किनाऱ्यावरील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत 2021 च्या भारतीय वन सर्वेक्षणानुसार (Forest Survey of India) सुमारे 324 चौरस किलोमीटर क्षेत्र कांदळवनांनी व्यापलेले आहे. अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणजे, जगभरात आढळणाऱ्या कांदळ वृक्षाच्या 72 प्रजातींपैकी भारतात एकूण 46 प्रजाती आढळतात आणि त्यातील 18 महत्त्वाच्या प्रजाती एकट्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आहेत. असे असतानाही, केवळ सिमेंटचे जंगल उभारण्यासाठी या अमूल्य जैवविविधतेवर सध्या सर्रास कुऱ्हाड चालवली जात आहे.
कांदळवनाचा सर्वाधिक संहार करणारा सध्याचा सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे 'वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड'. नरिमन पॉईंटपासून सुरू झालेला हा कोस्टल रोड सध्या वांद्रे (Bandra) पर्यंत वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. पुढील टप्प्यात तो वर्सोवा, भाईंदर आणि थेट पालघरपर्यंत नेण्यात येणार आहे. मात्र, यातील वर्सोवा ते भाईंदर या 26.3 किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडच्या टप्प्यासाठी कांदळवनातील तब्बल 45,000 पेक्षा जास्त वृक्षांची निर्घृण कत्तल केली जाणार आहे.
प्रशासकीय परवानगी : कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने कोस्टल रोडच्या उभारणीसाठी कांदळवनातील 45 हजार झाडे तोडण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता 'कांदळवन बचाव समिती' आणि पर्यावरणवाद्यांनी कितीही तीव्र विरोध केला, तरी प्रशासन त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही.
ग्राउंड रिपोर्ट आणि वास्तव : प्रत्यक्ष घटनास्थळी (Ground Zero) पाहणी केली असता, कांदळवनातील वृक्षतोडीला वेगाने सुरुवात झाली असून प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे. विकास आणि पर्यावरण यांच्यातील समतोल ढासळत असल्याचे हे भयानक चित्र आहे.
फेरलागवडीचा फोल दावा : तोडलेल्या झाडांच्या बदल्यात दुप्पट-तिप्पट झाडे भाईंदर आणि पालघरमध्ये लावू, असे आश्वासन सरकारने दिले आहे. मात्र, पर्यावरणवाद्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दावा केला आहे की, जिथे झाडे लावल्याचे सांगण्यात आले, तिथे प्रत्यक्षात कोणतीही लागवड झालेली नाही. एका ठिकाणचे कांदळवनाचे झाड उपटून दुसऱ्या ठिकाणी यशस्वी लागवड केल्याचे एकही उदाहरण सरकारने दाखवून दिलेले नाही.
पर्यावरणवाद्यांच्या मते, कांदळवनाचे महत्त्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेच नाही, ही सर्वात मोठी खंत आहे. हे कांदळवन मुंबईकरांचे आणि विशेषतः मच्छीमारांचे रक्षण कसे करते, हे खालील मुद्यांवरून समजून घेता येईल:
1. महापुरापासून संरक्षण : मुंबईतील सखल भागांत भरतीच्या वेळी पाणी तुंबते. हे कांदळवन नष्ट झाले, तर समुद्राचे पाणी थेट शहरात घुसून मुंबईत अभूतपूर्व महापुराचा धोका निर्माण होईल.
2. वादळांचा वेग रोखणे : समुद्रातून येणाऱ्या भयानक चक्रीवादळांना (Cyclones) अंगावर झेलण्याचे काम ही झाडे करतात, ज्यामुळे वाऱ्याची शक्ती व वेग कमी होऊन शहराचे नुकसान टळते.
3. त्सुनामीपासून रक्षण : समुद्रात भूकंप होऊन त्सुनामीसारखी (Tsunami) आपत्ती आल्यास, केवळ कांदळवनाची घनदाट भिंतच मुंबईचे संरक्षण करू शकते.
4. जमिनीची धूप थांबवणे : पावसाळ्यात जमिनीची धूप होऊन येणारा गाळ या झाडांच्या मजबूत मुळांमुळे खाडीतच साठून राहतो, ज्यामुळे जमीन वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
5. सहा पट जास्त कार्बन शोषण : हवेतील प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ (Global Warming) नियंत्रित ठेवण्यात कांदळवने महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण जमिनीवरील सामान्य वनांच्या तुलनेत कार्बन शोषून घेण्याची कांदळवनांची क्षमता ६ पट जास्त असते.
6. माशांचे प्रजनन केंद्र व उपजीविका : कांदळवनातील वृक्षांच्या मुळाशी मासे मोठ्या प्रमाणात अंडे देतात. त्यामुळे हे नष्ट झाल्यास किनारपट्टीवरील माशांचे प्रमाण घटेल आणि मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल.
पर्यावरण तज्ज्ञांचा इशारा : "जर याच वेगाने मुंबईतील कांदळवने नष्ट केली गेली, तर मुंबई शहर लवकरच एक 'हिट आयलंड' (Heat Island) बनेल. हिरवे जंगल पूर्णपणे संपून काँक्रीटचे जंगल वाढल्यामुळे शहराचे तापमान नियंत्रित करणे अशक्य होईल. मुंबईकरांनी आताच जागे होऊन याचे रक्षण केले नाही, तर भविष्यात निसर्गाचे मोठे संकट आल्याशिवाय आमचे डोळे उघडणार नाहीत."
भविष्यात या कांदळवनांचे रक्षण करण्याची आणि ही नैसर्गिक ढाल वाचवण्याची जबाबदारी केवळ पर्यावरणवाद्यांची नसून प्रत्येक मुंबईकराची आहे. वेळीच एकत्र येऊन आपण आपल्या हक्काच्या ढालीचे रक्षण करायला हवे.