मान्सून केरळमध्ये दाखल, पण महाराष्ट्रात कधी? शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी? पंजाबराव डखांनी सांगितली सविस्तर माहिती
एबीपी माझा वेब टीम June 06, 2026 01:13 AM

Maharashtra Weather News : केरळमध्ये मान्सून (Monsoon Alert) दाखल झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. पुढील 48 तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या मान्सूनबाबात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील माहिती दिली आहे. केरळमध्ये मान्सून सक्रिय झाला असून आता तो महाराष्ट्राकडे वेगाने सरकत आहे. 

7 ते 14 जून दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा दुष्काळ पडणार नसून, पिकांना आवश्यक तेवढा सरासरी पाऊस पडेल आणि खरीप हंगाम चांगला राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

यंदाच्या पावसाबाबत मोठे अंदाज

यावर्षी दुष्काळ पडणार नाही.
जून महिन्यात पाऊस काहीसा कमी राहू शकतो.
पिकांना लागेल तेवढा सरासरी पाऊस मिळेल.
खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी परिस्थिती अनुकूल राहील.
परतीचा पाऊस यंदा खूप जोरदार राहण्याची शक्यता आहे

पेरणीचे संभाव्य तीन टप्पे

पहिला टप्पा: 7 ते 14 जून

दुसरा टप्पा: 20 ते 30 जून

तिसरा टप्पा : 10 ते 15 जुलै

पेरणी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

फक्त चार बोटं ओल गेली म्हणून पेरणी करू नका.
जमिनीत वीतभर ओल गेल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्या.
वीतभर ओल असल्यास महिनाभर पाऊस न पडला तरी पीक तग धरू शकते.
घाईघाईने पेरणी केल्यास नुकसान होण्याची शक्यता असते.

मान्सूनचा संभाव्य मार्ग

सुरुवातीला दक्षिण महाराष्ट्रातून मान्सूनची एंट्री होईल.
 कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता.
 या भागात पेरण्या तुलनेने लवकर होऊ शकतात.

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी अंदाज

नंदुरबार व धुळे जिल्ह्यांत सुरुवातीला मान्सून थोडा कमकुवत राहू शकतो.
मात्र रिमझिम पाऊस सुरू राहील.
7 जूननंतर मान्सून विदर्भ, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे आणि संभाजीनगर भागाकडे सरकेल.
पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी.

यंदा मान्सूनचा प्रवास 3 दिवस उशिराने

यंदा मान्सूनचा प्रवास 3 दिवस उशिराने, मान्सून केरळात 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र यंदा तो 3 जून रोजी दाखल झाला आहे. याचदरम्यान, हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. केरळमध्ये मान्सून धडकला असून यंदा तीन दिवस उशिराने आला आहे. मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल झालेली आहे. कोकणात सुद्धा 48 तासांत पाऊस दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.