और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
जयदीप मेढे June 06, 2026 09:43 PM

Shreyas iyer: भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरचा गेल्या चार वर्षांचा प्रवास हा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखाच चढ-उतारांनी राहिला. दुखापतींचे मोठे संकट, संघातून बाहेर पडण्याची वेळ आणि त्यानंतर आता टीम इंडियात टी-20 कॅप्टन होत केलेले दिमाखदार पुनरागमन हा त्याचा प्रवास अत्यंत थक्क करणारा आहे. टीम इंडियाची आशियाई स्पर्धा आणि आर्यलंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी श्रेयस कॅप्टन असून सूर्यकुमार यादवची कॅप्टनसह संघातून उचलबांगडी झाली आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या करारातून वगळलं जाणं ते त्याच बीसीसीआयने नेतृत्वाची संधी देणं इतका जिगरबाज प्रवास श्रेयसचा झाला आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी निवड न होणे हा सुद्धा त्याच्यासाठी धक्का होता. मात्र, त्याने आयपीएलमध्ये दिमाखदार कामगिरी करताना सुर्याची सुट्टी करून टाकली. 

गंभीर दुखापतींचे संकट आणि शस्त्रक्रिया

श्रेयस अय्यरच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण काळ 2021 मध्ये सुरू झाला, जेव्हा भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याला मोठ्या काळासाठी क्रिकेटपासून दूर राहावे लागले आणि त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. या दुखापतीतून तो सावरत असतानाच, 2023 च्या सुरुवातीला त्याला पाठीच्या खालच्या भागाचा त्रास (Back Injury) सुरू झाला. हा त्रास इतका वाढला की त्याला पुन्हा एकदा शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. या काळात तो आयपीएल आणि अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकला.

बीसीसीआयचे केंद्रीय कंत्राट गमावलं

दुखापतींमुळे मैदानाबाहेर राहिल्याने श्रेयस अय्यरला केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले. 2024 च्या सुरुवातीला रणजी ट्रॉफी खेळण्यावरून झालेल्या वादात बीसीसीआयने (BCCI) त्याला केंद्रीय कंत्राटातून (Annual Contract) बाहेर केले. संघातून जागा जाणे आणि बोर्डाची नाराजी ओढवून घेणे हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा धक्का होता. फॉर्म आणि तंदुरुस्ती गमावल्यामुळे त्याच्या भविष्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते.

देशांतर्गत क्रिकेटमधून पुनरागमन

या सर्व संकटांनंतर श्रेयसने हार मानली नाही. त्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा देशांतर्गत क्रिकेटचा मार्ग निवडला. त्याने मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा कर्णधार म्हणून त्याने अप्रतिम नेतृत्व केले. त्याच्या शांत आणि आक्रमक नेतृत्वाखाली केकेआरने 2024 चे आयपीएल विजेतेपद पटकावले, ज्यामुळे त्याचे भारतीय संघातील पुनरागमनाचे दरवाजे पुन्हा उघडले.

2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात दमदार कामगिरी

पाठीच्या गंभीर शस्त्रक्रियेनंतर थेट 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात पुनरागमन करत त्याने 11 सामन्यांत 530 धावा कुटल्या, ज्यात सलग दोन शतकांचा समावेश होता. श्रेयसची शॉर्ट-पिच (बाउन्सर) चेंडूंविरुद्ध कमकुवतपणा जगजाहीर होती. मात्र, त्याने नेट प्रॅक्टिसमध्ये कठोर परिश्रम करून या समस्येवर मात केली. आयपीएल 2024 मध्ये केकेआरला चॅम्पियन बनवून त्याने आपण केवळ एक उत्तम फलंदाज नसून एक परिपक्व कर्णधार असल्याचेही जगाला दाखवून दिले.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.