मान्सून महाराष्ट्रात दाखल; यंदा पावसाचं प्रमाण कसं राहणार? पंजाबराव डख यांचा पहिला अंदाज समोर
Tv9 Marathi June 07, 2026 01:45 AM

यंदा देशात मान्सूनच आगमन विलंबानं झालं आहे. काही दिवसांपूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. दरम्यान मान्सून राज्यात येत्या 10 जूनपर्यंत दाखल होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत होता, परंतु हवामान खात्याने वर्तवलेल्या वेळेआधीच म्हणजे 6 जूनला मान्सून राज्यात दाखल झाला आहे.  मान्सूनंच तळकोकणात आगमन झालं असून, काही ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झाली आहे. आता लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. दरम्यान यंदाच्या पावसावर अल निनोचं सावट आहे. त्यामुळे यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस पडले असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मात्र त्यानंतर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा देखील मान्सूनबाबतचा पहिला अंदाज समोर आला आहे, यंदा राज्यात पावसाचं प्रमाण कसं राहणार याबाबतचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. हवामान खात्याने यंदाच्या मान्सूवर अल निनोचं संकट असणार आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे पाऊस सरासरी पेक्षा कमी होण्याचा अंदाज आहे. परंतु दुसरीकडे पंजाबराव डख यांनी मात्र राज्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडून पिके चांगले येतील, असं म्हटलं आहे. राज्यात परतीचा पाऊस चांगला कोसळेल त्यामुळे खरीप आणि रब्बी असे दोन्ही पिके चांगले येतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

कोकणात पावसाला सुरुवात 

दरम्यान आज मान्सून तळ कोकणात दाखल झाला असून, मालवण परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या पहिल्या पावसामुळे वातावरण अल्हादायक बनलं आहे. उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. राज्याच्या इतरही भागात पाऊस सुरू आहे, मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून मान्सून पूर्व पाऊस आहे. शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये, असं आवाहानही हवामान विभागाकडून या सर्व पार्श्वभूमीवर करण्यात आलं आहे. आता पुढील काही दिवसांमध्ये मान्सून हळुहळु संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यात आहे. आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.