ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले….
Tv9 Marathi June 10, 2026 03:46 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटातील खासदार फुटण्याच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडत या सर्व अफवा असल्याचा दावा केला आहे. तसेच, या चर्चांमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ठरवून आखलेली रणनीती असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ठाकरे गटाचे सर्व खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षासोबत ठामपणे उभे आहेत. “पक्षात फूट पडल्याच्या अफवा मुद्दाम पसरवल्या जात आहेत. एखादी राजकीय वावटळ निर्माण करून संभ्रमाचे वातावरण तयार करणे ही एक रणनीती आहे,” असे ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गट किंवा भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना राऊत यांनी या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. “आमचा सर्व खासदारांशी सातत्याने संपर्क आहे. स्वतः उद्धव ठाकरेही सर्व खासदारांशी थेट संवाद साधत आहेत. ज्यांना पक्ष सोडायचा होता ते आधीच गेले आहेत. सध्या कोणतीही निवडणूक जवळ नसताना खासदार पक्ष सोडतील, या चर्चांना कोणताही आधार नाही,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार विनायक राऊत यांच्याशी इतर पक्षांकडून संपर्क साधला जात असल्याच्या चर्चांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “राजकारणात संवाद सुरू असतो. कुणी संपर्क साधला म्हणजे पक्षांतर होते असे नाही. आमचे सर्व सहकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहतील,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटातील संभाव्य फूट आणि खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.