4399 दिवस… मोदींच्या नेतृत्वाने देशाला आत्मविश्वास दिला; मेघना बोर्डीकर यांच्याकडून गौरव
Tv9 Marathi June 10, 2026 04:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 4399 दिवस पंतप्रधानपदी राहण्याचा नवा विक्रम मोदींनी केला आहे. हा विक्रम आधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता. मात्र, नेहरूंनंतर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले मोदी हे दुसरे महत्त्वाचे नेते ठरले आहेत. मोदींचा हा 12 वर्षाचा कालखंड भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील विक्रमांचा आहे. हा कालखंड भारताच्या जागतिक पटलावरील उदयाचा आहे. मोदींच्या नेतृत्वाने या 12 वर्षात देशाला नवा आत्मविश्वास दिला आहे, असं मत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केलं आहे.

मंत्री मेघना बोर्डीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा गौरव करत मोदींच्या नेतृत्वात भारत कसा झपाट्याने प्रगतीपथावर गेल्याचं नमूद केलं आहे. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दक्षिण आशियातील देशांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा केवळ एक सत्तांतराचा औपचारिक कार्यक्रम नव्हता. तर शपथविधीनंतर गेल्या १२ वर्षांच्या कालखंडावर नजर टाकली, तर हा क्षण संपूर्ण देशाच्या स्थित्यंतराचा आणि अनेक दशकांच्या निद्रेनंतर झालेल्या राष्ट्र उदयाचा सोहळा होता. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कालखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी देशाला आत्मविश्वास दिला, नेतृत्व दिले, देशाची स्वतंत्र ओळख निर्माण करीत भारताचे नाव जगामध्ये नव्या उंचीवर नेले; त्याचवेळी देशातील जनतेची मानसिकताच बदलून टाकली. त्यामुळेच, आज भारत प्रत्येक क्षेत्रामध्ये घोडदौड करीत आहे आणि जगही भारताकडे मोठ्या विश्वासाने आणि आशेने पाहात आहे, असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे.

महिलांना आत्मसन्मान

सरकारच्या पहिल्या दिवसापासून ‘सब का साथ, सब का विकास’ हेच मोदींचे ब्रीदवाक्य आहे. आतापर्यंत कायम गृहीत धरलेला महिला वर्ग म्हणजे निम्मी लोकसंख्या. वर्षानुवर्षे मुख्य प्रवाहाच्या काठावरच राहिलेल्या महिलांमध्ये मोदींनी सुरक्षिततेची भावना निर्माण केली, त्यातून महिलांमध्ये आत्मविश्वास आला. ‘बेटी बचाव’चा नारा देतानाच मुलींचे शिक्षण आणि पायाभूत सुविधांवरही लक्ष दिले. त्यामुळे मुलींच्या शाळागळतीचे प्रमाण आज कमी झाले आहे. विज्ञानज्योती योजनेतून ग्रामीण भागातील मुलींना अभियांत्रिकी व विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कारकीर्द घडविण्यासाठी मार्गदर्शन आणि अन्य सहाय्य मिळाले. त्याचा लाभ देशभरातील ८० हजार मुलींना झाला आहे. तर, आयआयटी व एनआयटीमध्ये अतिरिक्त २० टक्के जागा निर्माण केल्या. त्या जागांवरील प्रवेशामुळे आयआयटीमधील मुलींचे प्रमाण आठ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे, असंही बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. प्रत्येक योजनेतून महिला वर्गाला संरक्षण, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान मिळाला. त्यांच्यातील वाढलेल्या आत्मविश्वासातून आता ‘ड्रोन दीदी’सारख्या योजना राबविण्यात येत आहेत आणि त्यामुळे महिलांचा आत्मनिर्भर होण्याचा मार्ग खुला झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.

विकासाची पायाभरणी

पारदर्शकतेला तंत्रज्ञानाची जोड देताना, डिजिटल पेमेंट अर्थव्यवस्थेला प्रोत्सादन दिले. ‘यूपीआय’च्या माध्यमातून होणारे डिजिटल व्यवहार हा आज दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून शासनाच्या सेवा नागरिकांच्या मोबा लपर्यंत पोचल्या आहेत. आज भारत जगातील सर्वांत मोठी डिजिटल पेमेंट अर्थव्यवस्था बनलेले आहे. २०२६ च्या मे महिन्यात यूपीआय व्यवहारांचे एकूण मूल्य सुमारे ३० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचले आहे. एप्रिल २०१६ मध्ये यूपीआय पद्धती सुरू झाल्यापासूनचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा विक्रम आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

मोदींच्या पंतप्रधानपदाचा प्रवास पाहिला असता, स्पष्टपणे जाणवते, भारतात विकासाची गती, आत्मविश्वास आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा यात मोठी वाढ झाली आहे. हा प्रवास केवळ एका सरकारचा कालखंड नाही, तर तो भारताच्या वाढत्या आत्मविश्वासाचा, नव्या आकांक्षांचा आणि विकासाच्या नव्या पर्वाचा इतिहास आहे. सामान्य नागरिकाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून भारताला जागतिक नेतृत्वाच्या दिशेने नेण्याचा हा प्रयत्न आगामी काळातही देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ ठरेल, अशी अपेक्षा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.