शेतकऱ्यांचे 130 कोटी थकले, गोकुळ कारखान्याविरोधात मोठे आंदोलन, पैसे देण्यासाठी होणार जप्तीची कारवाई?
Tv9 Marathi June 10, 2026 10:45 PM

 टीव्ही 9 मराठी, सोलापूर, सागर बोरसे : गोकुळ साखर कारखान्याने ऊस बिल थकवल्याच्या निषेधार्थ सोलापुरात शेतकरी आक्रमक झाले आहेत. येथे गोकुळ कारखान्याने शेतकऱ्यांचे 130 कोटी रुपयांचे ऊस बिल थकवल्याने मागील 17 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. दरम्यान, गेल्या 17 वर्षांपासून हे आंदोलन सुरू असूनही कोणीच त्याची दखल न घेतल्याने या शेतकऱ्यांनी शेवटी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांकडून शेतकऱ्यांचा मोर्चा तलावाच्या अलीकडेच अडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु तरीदेखील आक्रमक शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करून आपला निषेध नोंदवला. मिळालेल्या माहितीनुसार भाजपशी संबंधित दत्ता शिंदे हे गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.

नेमके प्रकरण काय आहे?

सोलापूरच्या धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाचे 130 कोटी रुपयांचे बील थकवलेले आहे.
भाजपशी संबंधित दत्ता शिंदे हे गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. 2025 -26 सालाच्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकीत रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे मागील 2 वर्षापासून या कारखान्याने विनापरवाना गाळप केलेले आहे. थकीत बिलाची रक्कम मिळावी म्हणून सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मागील 17 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून उपोषणाची कोणतीही दखल न घेतल्याने अखेर शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन केले.

चेअरमन दत्ता शिंदे यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही

दरम्यान महसूल प्रशासनाकडून कारखान्याविरोधात आरआरसीची कारवाई सुरू आहे. या कारवाई अंतर्गत आतापर्यंत 6 पैकी 2 नोटिशी देण्यात आल्या आहेत. सहा नोटीस पूर्ण होण्यासाठी आणखी 2 महिन्याचा कालावधी लागणार आहे. गोकुळ साखर कारखान्याने चेन्नई येथील एका कंपनीला 15 कोटी रुपयांना फसवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने पाठवलेल्या दोनही नोटीसला चेअरमन दत्ता शिंदे यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही. त्यामुळे राज्य सरकार संबंधित गोकुळ साखर कारखान्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कारखान्याची मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे दिले जाणार

या प्रकरणावर साखर आयुक्त संजय कोलते यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात अद्यापही 677 कोटी थकीत एफआरपी आहे. थकीत एफआरपी प्रकरणी राज्यातील सात कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ सहकारी साखर कारखान्याचादेखील समावेश आहे. गोकुळ सहकारी साखर कारखान्याकडे 130 कोटी रुपयांची थकीत एफआरपी आहे. गोकुळ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत 39 हजार 756 कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या गाळप हंगामात ऊस उत्पादन आणि साखर उत्पादन वाढलेलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.