कल्याण-डोंबिवलीत पाणीटंचाई टाळण्यासाठी मोठा निर्णय, टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार
Tv9 Marathi June 11, 2026 01:45 AM

देशात यंदा कमी पावसाची शक्यता आहे, त्यामुळे आतापासूनच पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनही सतर्क झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत पाणीटंचाई टाळण्यासाठी 20% पाणी कपात करण्यात येणार आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता या महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. KDMC मध्ये कोणत्या भागात कोणत्या दिवशी पाणीकपास असणार याबाबत माहिती जाणून घेऊयात.

संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा अल निनो (El Niño) आणि आयओडी (IOD) च्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी जलसंपदा विभागाने सर्व महानगरपालिका आणि संबंधित प्राधिकरणांना दररोज 20 टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) प्रशासनाने बारावे, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रांतून होणारा पाणीपुरवठा नियोजित पद्धतीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या दिवशी कुठे पाणीपुरवठा बंद?
  • 12 जून व 17 जून : नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होणाऱ्या डोंबिवली (पूर्व) येथील ‘फ’ व ‘ग’ प्रभागात 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार.
  • 13 जून व 18 जून : बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होणाऱ्या कल्याण (पूर्व) येथील ‘ड’ व ‘जे’ प्रभाग, तसेच कल्याण (पश्चिम) मधील गोदरेज हिल, पारनाका आणि सुभाष मैदान परिसर बाधित राहणार.
  • 14 जून व 19 जून : डोंबिवली (पश्चिम) येथील ‘ह’ प्रभागात पाणीपुरवठा बंद राहील.
  • 15 जून व 20 जून : कल्याण (पश्चिम) मधील ‘ब’ व ‘क’ प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा बंदचा फटका बसणार.
  • 16 जून व 21 जून : मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होणाऱ्या मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच कल्याण ग्रामीण भागातील गावे, योगिधाम, मिलिंद नगर, बिर्ला कॉलेज, चिकनघर, मुरबाड रोड आणि वालधुनी परिसरात 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नागरिकांना आवाहन

महानगरपालिकेने नागरिकांना आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा रात्री 12 वाजल्यापासून पुढील 24 तास पूर्णपणे बंद राहणार असल्याने नागरिकांनी योग्य नियोजन करावे, असे आवाहन KDMC प्रशासनाने केले आहे. पावसाळा उशिरा येण्याची शक्यता आणि जलसाठ्यावरील वाढता ताण लक्षात घेता, ही पाणी कपात पुढील काळात अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.