आस्तिक असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं एक आराध्य दैवत असतं. त्या देवाचा संकटकाळी धावा केला जातो. अनेक संकटकाळाची वाट न पाहता देवाचा रोज नामजप करत असतात. कलयुगात नामजपाचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. नामजपातून देवाशी भावनिक नाते जोडलं जातं असं धर्मशास्त्रात सांगितलं गेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं आहे की, ‘पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति, तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः’ या श्लोकाचा अर्थ असा की, भक्तीभावाने अर्पण केलेलं कोणतंही पान, फूल, फळ किंवा पाणी आनंदाने स्वीकारतो. असंच जप हा प्रेम आणि भकीचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्रेता आणि द्वापर युगात देवाला प्रसन्न करण्यासाठी निरंतर भक्ती, तपस्या आणि यज्ञ केले जात होते. पण कलियुगात जपाचं महत्त्व अधिक आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या माळेवर कोणत्या देवाचा जप केला जातो ते…
रुद्राक्ष : रूद्राक्ष हे महादेवांना अतिप्रिय आहे. त्यामुळे या माळेवर जप केल्याने भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. रुद्राक्ष माळा परिधान केल्याने अकाल मृत्यूपासून बचाव होतो असं मानलं जातं. भगवान शिव सर्व इच्छा पूर्ण करतात. पण माळ धारण करणे किंवा जप केल्याने कर्म सुधारतं असं नाही. तर व्यक्तीची कर्मही चांगली असणं गरजेचं आहे.
स्फटीक माळ : ही माळ देवी लक्ष्मी, सरस्वती आणि शुक्र ग्रहाला प्रिय आहे. स्फटीक माळ अत्यंत पवित्र आणि फलदायी मानलं जातं. या माळेवर जप केल्याने मन शांत होते आणि एकाग्रता वाढते. तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते. स्फटिकाचे मणी विशेष शक्ती प्रदान करतात.
तुळशीची माळ : वारकरी संप्रदायातील लोकं तुळशी माळ गळ्यात परिधान करतात. तसेच अनेक जण या माळेवर जपही करतात. ही माळ भगवान विष्णुला प्रिय आहे. त्यामुळे या माळेवर भगवान विष्णु आणि पांडुरंगाचा जप केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, गळ्यात 108 दिवस तुळशी माळ घातल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते.
कमलमणी माळ : कमलमणी अर्थात कमळाच्या बियांची माळ महालक्ष्मीला प्रिय आहे. देवी लक्ष्मीचं कमळ हे आसन आहे. त्यामुळे या ठिकाणी देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे या माळेवर देवी लक्ष्मीचा जप केला तर विशेष फळ मिळतं. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.