ठाण्यात वृद्धाला बेदम मारल्याच्या घटनेनंतर मनसेच्या प्रमुख नेत्याची देवेंद्र फडणवीस यांना एकच कळकळीची विनंती की..
Tv9 Marathi June 11, 2026 04:45 PM

ठाण्यात एक वृद्ध व्यक्ती आणि ओला चालकाचा किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यानंतर ओला चालकाने वयाचा तसच कुठलाही पुढचा मागचा विचार न करता वृद्धाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या परप्रांतीय ओला चालकाला शोधून काढलं आणि शिवसेना स्टाईलने चोप दिला. स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घातलं. त्यांनी पोलिसांना फोन लावून 307 चं कलम टाकायला सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली. ठाण्यातील मनसेचे प्रमुख नेते अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह विवियाना मॉल परिसरात जाऊन ओला-उबर चालकांना इशारा दिला.

आज अविनाश जाधवयांनी पत्रकार परिषद घेऊन ठाण्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. “ठाण्यात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन मोठे गुन्हे ठाण्यात घडलेत. एका जेष्ठ नागरिकाला मारहाण झाल्यानंतर दोन हत्येचे गुन्हे घडले. समाजावर किंवा गुन्हेगारांवर पोलिसांचा जो वचक असायला हवा होता तो उरलेला नाही” असं अविनाश जाधव म्हणाले. “अनेक गुन्ह्यांच प्रमाण वाढलेलं आहे. नक्की ठाण्याचा बिहार होतोय का?” असा सवाल त्यांनी विचारला. “गृह मंत्र्यांना माझी विनंती आहे, त्यांनी ठाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, मागच्या निवडणुकीत ठाणेकरांनी त्यांना भरभरुन प्रेम दिलं आहे आता त्याचा मोबदला देण्याची वेळ आलेली आहे” असं अविनाश जाधव म्हणाले.

याचा ठाणेकरांमध्ये राग आणि चीड

“फोनवर काय गुन्हे दाखल करायचे हे जर उपमुख्यमंत्री सांगत असतील तर मूळ गुन्हेगारांवर कारवाईच्या सूचना देखील त्यांनी पोलीस आयुक्तांना द्यायला हव्या. कायद्याची आणि पोलिसांची भीती गुन्हेगारांना झाली पाहिजे. हायवेला मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहेत, लोकांवर सरळ हल्ले करायला लोकांनी सुरुवात केलेली आहे. याचा ठाणेकरांमध्ये राग आणि चीड आहे” असं अविनाश जाधव म्हणाले.

गृह खात्याने लक्ष द्यायला पाहिजे

“ज्या मॉलच्या बाहेर जेष्ठ नागरिकाला मारहाण केल्याची घटना घडली. त्याठिकाणी खूप काही चुकीच घडतंय. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात टपऱ्या आल्या आहेत, तंबाखू, गुटखा विकले जातात. गुटखा बंदी असतांना देखील ते विकले जातात, पोलीस काय करत आहेत, पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे, गृह खात्याने लक्ष द्यायला पाहिजे” असं अविनाश जाधव म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.