Sanjay Raut : केंद्रातील बकासुरांशी लढायचं असेल तर… संजय राऊत यांचं पुन्हा एकदा एनसीपीच्या विलिनीकरणावर मोठं भाष्य; नेमकं काय म्हणाले?
Tv9 Marathi June 12, 2026 02:45 PM

पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी वर्चस्व गाजवणार ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष (TMC) काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातही खळबळ उडवणारी बातमी समोर आली. शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं (NCP) देखील काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार अशा अनेक चर्चा सुरू असून त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही काँग्रेस पक्षात विलीन होण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. कालपासून याच विषयावर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे.

दरम्यान काँग्रेसची विचारधारा असणाऱ्या देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं, काँग्रेसला मजबूत करावं, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतीच घेतली होती. त्यांनी पुन्हा या विलीनीकरणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांन पुन्हा सूचक वक्तव्य केलं आहं. ‘ केंद्रातील बकासूरांशी लढायचं असेल तर एकत्र आलं पाहिजे,’ अशे राऊत म्हणाले. काँग्रेसच्या बाजूने मूळ पक्ष आले पाहिजेत अशी भूमिका राऊत यांनी मांडली.

काय म्हणाले संजय राऊत ?

एनसीपी ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) च्या विलीनीकरणावर संजय राऊत यांनी पुन्हा भाष्य केलं. काँग्रेसमधून पडलेल्या प्रत्येक नेत्याला स्वतंत्र मत आहे. मग पवार असतील, केसीआर असतील ममता बॅनर्जी असतील हे सर्व काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. विलिनीकरण होणार असेल तर शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा हे म्हटलं आहे. त्यांनी पुढाकार घेऊन मजबूत राष्ट्रीय काँग्रेस उभा केला तर आमच्या सारख्या प्रादेशिक पक्षांना बळ मिळेल, असं संजय राऊत म्हणाले.

मी राष्ट्रीय स्तरावरची भूमिका मांडत आहे. केंद्रातील बकासूरांशी लढायचं असेल तर एकत्र आलं पाहिजे. पांडवाच्या बाजूने अनेकजण आले, तसेच काँग्रेसच्या बाजूने मूळ पक्ष आले पाहिजे. नाही तर तेही टिकणार नाही असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.

त्या तर अमित शाह यांच्या कंपन्या

यावेळी राऊत यांनी शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटावर निशाणा साधला. तुम्ही विषयाला वेगळी दिशा देऊ नका. आता राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसला मजबूत करण्याचा मुद्दा आहे. दोन कम्युनिस्ट पक्ष एकत्र येणार का? इथे शिवसेना आहे. अमित शाहांच्या गटाला पश्चात्ताप झाला असेल तर त्यांनी मातोश्रीत यावं. शिंदे गट हाँ काही पक्ष नाही. राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. शिंदे गट, अजित पवार गट हे पक्ष नाहीत. त्या तर अमित शाह यांच्या कंपन्या आहेत. सुप्रीम कोर्टात निर्णय व्हायचा बाकी आहे. काय करायचे की नाही. आधी राष्ट्रीय स्तरावर काय होते ते होऊ द्या, असं राऊत यांनी सुनावलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.