मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 12 वर्ष पंतप्रधान पदाची कारकिर्द पूर्ण केलीय. हे करत असताना 4 हजार 398 दिवस हा लाॅगेस्ट इलेक्टेड पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम मोडला. या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीसंदर्भात माहिती दिली आहे.
कर्जमाफी आम्ही केलेली आहे, या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्थी आम्ही टाकलेल्या नाहीत. एकच अट आम्ही टाकलेली आहे ती महाराष्ट्रातील बँकिंग यंत्रणा आहे, त्यातल्या त्यात जिल्हा सहकारी बँका टिकल्या पाहिजेत, यासाठी ती अट टाकली आहे. ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे, त्यांच्याकरता आम्ही यावेळी माफी करणार आहोत. मात्र, ती एका फिक्स रकमेपर्यंत त्यांची माफी करणार आहोत, उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. अन्यथा आपली बँकिंग यंत्रणा पूर्णपणे उद्धवस्त होईल.
बाकी 40 लाख शेतकऱ्यांना विना अट कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आम्ही कर्जमाफी संदर्भात एक उपसमिती तयार केलीली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर काही मंत्र्यांचा त्यात समावेश असेल. ही कर्जमाफी जशी पुढं जाईल त्यातील अडचणी समोर येतील, त्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी या उपसमितीची असेल. कुठल्याही निवडणुका समोर नसताना ही कर्जमाफी केलेली आहे. विरोधी पक्षांनी कोणतीही ठोस मागणी न करता केलेली कर्जमाफी आहे. शासनानं स्वत: केलेली कर्जमाफी आहे. आमच्या डोळ्यासमोर राजकीय हेतू नाही, आपल्या शेतकऱ्याला कसं सक्षम करता येईल. अन्यथा 2029 ची निवडणूक असल्यानं डिसेंबर 2028 ला कर्जमाफी करता आली असती,ते आम्ही केलेलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज राज्यात अनेक शेतकरी असे आहेत आपला माल निर्यात करत आहेत. अनेक शेतकरी असे आहेत जे शेतीत परिवर्तन करत माॅडेल शेती तयार करत आहेत. शेतीला फायद्यात आणत आहेत. मात्र गरीब शेतकऱ्यांना मदत करावी लागेल आणि सक्षम करावं लागेल. सरकार ते करेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. याशिवाय वित्त विभागासंदर्भात बोलायचं तर आता तरी अर्थ विभाग माझ्याकडेच आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
एल निनोसंदर्भात आपण तयारी करत आहोत. राज्यावर त्याचा परिणाम होईल आणि टास्कफोर्स आपण तयार केला आहे. जलसंधारणावर आपण भर दिला आहे. पाऊस कमी असला तरी आपण मार्ग काढूयात. राज्य सरकारच्या सल्ल्याच्या आधारे पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, ॲडव्हायजरीकडे लक्ष द्यावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.