बीसीसीआय निवड समितीने अवघ्या काही दिवसांआधी आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने संघ जाहीर करण्यासह टी 20i टीमचा कर्णधारही बदलला. निवड समितीने सूर्यकुमार यादव याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं. इतकंच नाही तर सूर्याला आगामी दोन्ही टी 20i मालिकांसाठी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. सूर्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा भाग नाही. त्यात टी 20i संघात त्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे सूर्याचं आंतरराष्ट्रीय करियर संपल्याचं म्हटलं जात आहे. त्यात आता अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्या कारकीर्दीवर सूर्याप्रमाणे टांगती तलवार असल्याचं म्हटलं जात आहे.
हार्दिक गेल्या अनेक महिन्यांपासून कोणत्याही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाकडून खेळलेला नाही. हार्दिक सूर्याप्रमाणे कसोटी संघाचा नियमित सदस्य नाही. मात्र हार्दिक एकदिवसीय आणि टी 20i क्रिकेटमध्ये सातत्याने खेळतोय. मात्र हार्दिक संध्या कोणत्याही फॉर्मेटमधील टीमचा भाग नाही. हार्दिकची सूर्याप्रमाणे आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी निवड करण्यात आलेली नाही. हार्दिक कसोटी संघाचा गेल्या अनेक वर्षांपासून भाग नाही. तर हार्दिकला 13 जूनपासून अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय. त्यामुळे हार्दिकच्या करियरबाबत क्रिकेट चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
हार्दिकने 10 वर्षांआधी 2016 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हार्दिकला दुसऱ्याच वर्षात 2017 कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. तर हार्दिकने अखेरचा कसोटी सामना हा 2018 साली खेळला आहे. हार्दिकने आतापर्यंत 11 कसोटी सामन्यांमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकासह एकूण 532 धावा केल्या आहेत. हार्दिक अशाप्रकारे गेल्या 8 वर्षांपासून कसोटी संघातून बाहेर आहे.
टीम इंडियाने मार्च 2025 मध्ये न्यूझीलंडला अंतिम फेरीत पराभूत करुन चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. हार्दिकचा वनडे क्रिकेटमधील हा अखेरचा सामना होता. हार्दिकची अफगाणिस्तान विरूद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली. मात्र हार्दिकला दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय. मात्र बीसीसीआयकडून हार्दिकच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
बीसीसीआयने फिट असेल तरच खेळता येईल या अटीवर हार्दिकची अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड केली होती. त्यानुसार हार्दिक फिटनेस टेस्टमध्ये पास झाला. मात्र त्यानंतर काही तासांनी हार्दिक वनडे सीरिजमधून बाहेर झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र बीसीसीआयने हार्दिकबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र असं असलं तरी आता हार्दिक काही महिने टीम इंडियाच्या जर्सीत खेळताना दिसणार नाही.