Eknath Shinde vs Ganesh Naik : कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ शिंदेंच नाव का नाही? गणेश नाईकांना विचारताच त्यांनी दिलं असं उत्तर
Tv9 Marathi June 15, 2026 03:45 PM

नवी मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. कारण नवी मुंबई मनपातर्फे उद्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध आरोग्य विषयक सुविधांचा उद्घाटन सोहळा होणार आहे. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नावचं छापलेलं नाही. नवी मुबंईत उद्या आरोग्य सेवा कामांचा लोकर्पण सोहळा आहे. या कार्यक्रमात आमदार व वनमंत्री गणेश यांचं नाव आहे तसेच खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव आहे. मात्र ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नवी मुबंई पालिकेच्या पत्रिकेत नाही. नवी मुबंईच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना डावललं गेलं आहे.

“कार्यक्रम पत्रिकेतील नाव वगळल्यानेएकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच खासदार नरेश म्हस्के यांनी नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी असा प्रकार होत असेल तर शिवसेनेचे नगरसेवक शिवसेना स्टाईलने उत्तर देणार असा इशारा त्यांनी दिला. ज्या पद्धतीने नवी मुंबईचा कारभार सुरू आहे तो चुकीचा आहे. ठाणे महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता आहे. यापूर्वी सुद्धा शिवसेनेची युतीशिवाय एक हाती सत्ता होती .आता युती आहे. आम्ही त्यांचं नाव टाकत असतो” असं खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

शिंदेंसोबत असं पहिल्यांदा घडलेलं नाही

नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत पहिल्यांदा असं घडलेलं नाही. काही दिवसांपूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने नवी मुंबईतील विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला होता. मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हते. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले होते.

गणेश नाईक यांनी काय उत्तर दिलं?

आता नवी मुंबई महानगर पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. आज शाळांचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वनमंत्री गणेश नाईक नवी मुंबईतील शाळेत आले होते. त्यावेळी त्यांना या बद्दल विचारलं असता ते म्हणाले की, ‘मला त्याची कल्पना नाही. आपण महापालिका आयुक्तांना विचार’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.