मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी शाहू महाराज यांना पत्रकारांनी विचारलं की, तुमची जरांगेंबरोबर चर्चा सविस्तरपणे झाली का? तुम्ही जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्यावर शाहू महाराजांनी, नाराजी व्यक्त केली नव्हती. आमच्यात समन्वय राहील असं उत्तर दिलं. कोल्हापुर गॅजेटच्या प्रश्नावर शाहू महाराज म्हणाले की, आता जरांगेंनी हा विषय सीरीयसली घेतला आहे. आपण कोल्हापुरकरांनी सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे.
त्यानंतरमनोज जरांगेयांनी लगेच बोलायला सुरुवात केली. “पश्चिम महाराष्ट्राचा मध्यभाग कुठे येतो ते आम्ही बघणार. दणक्यात कार्यक्रम लावतो. दुसऱ्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या गॅझेटची अमलबजावणी केली पाहिजे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “आता सातारा संस्थानसाठी एक महिन्याचा वेळ घेतला आहे. महाराज साहेबांचं बोलणं होईल त्यांच्याशी” असं जरांगे पाटील बोलले.
पश्चिम महाराष्ट्र सधन आहे असं बोलून, बोलून आपल्याला संपवतील
“पश्चिम महाराष्ट्राला झुंजावं लागेल. पश्चिम महाराष्ट्रातल्या बांधवांना माझं सांगण आहे की, आपल्याला झुंजावं लागेल. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी घराबाहेर यावं लागेल. पश्चिम महाराष्ट्र सधन आहे असं बोलून, बोलून आपल्याला संपवतील” असं जरांगे पाटील म्हणाले. “आपल्याकडे सगळं असलं तरी आरक्षणााच आधार घेऊन मुलं उच्चशिक्षणात गेली पाहिजेत. ऊस, फळबागा आहेत म्हणून उच्च शिक्षण घेऊ नये का?” असा सवाल त्यांनी केला.
वाईट दिवस कधी येतील ते सांगता येत नाही
“आज सगळं आहे. पण वाईट दिवस कधी येतील ते सांगता येत नाही. तुमच्याकडे भरपूर आहे. आम्ही पाटील लगेच फुगतो. लोक आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगायला शिकवतातत. आज तुम्ही जितके श्रीमंत आहात, उद्या तुमची मुलं अधिकारी झाली तर अजून श्रीमंत व्हालं” असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
तेव्हा एकही मराठा घरात नको
“आपल्याकडे भरपूर आहे. पण आरक्षण पदरात पाडून घेणं गरजेच आहे. आपल्या पुढच्या पिढीला चांगले दिवस आणण्यासाठी आपण खस्ता खाऊ. आपल्याला घर सोडावं लागेल. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप मोठा वारसा निर्माण करुन ठेवला आहे. आपल्याला आळशी राहून चालणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या मध्यभागी कार्यक्रम होईल, तेव्हा एकही मराठा घरात नाही राहिला पाहिजे” असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.