विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 3 आठवडे चालणार अधिवेशन, हे मुद्दे गाजणार
Tv9 Marathi June 15, 2026 06:45 PM

मोठी बातमी समोर येत आहे, कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली असून, आता पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 22 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.  10 जुलैपर्यंत हे अधिवेशन असणार आहे.  तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये काही मुद्दे हे चांगलेच गाजण्याची शक्यता असून, विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न होऊ शकतो. सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी केली आहे. परंतु त्यामध्ये काही अटी अशा आहेत, ज्यांचा शेतकऱ्यांना फटका बसू शकतो.  ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन लाखांपेक्षा अधिक आहे, त्या शेतकऱ्यांना उर्वरीत रक्कम आधी भरावी लागणार आहे, त्यानंतरच त्यांना दोन लाख रुपयांचा कर्जमाफीचा फायदा होणार आहे.

दरम्यान सरकारने ही अट रद्द करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे, त्यानंतर त्यांनी तीन दिवस अन्नत्याग आंदोलन देखील केलं, अखेर तिसऱ्या दिवशी त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. त्यामुळे या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.  यावरून विरोधक सरकारच्या कोंडीचा प्रयत्न करू शकतात. त्याचसोबत इरही काही मुद्दे आहेत, ज्यावरून या अधिवेशनात विरोधक आक्रमक होऊ शकतात.

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

दरम्यान अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अधिवेशन हे फक्त 14 दिवसांचं होणार आहे, परंतु हे अधिवेशन कमीत कमी 1 महिन्यांचं व्हावं अशी आमची मागणी असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे, परंतु  पुरवणी मागण्या मंजूर करणे एवढाच  सरकारचा या अधिवेशनातून  उद्देश असतो, असा टोलाही यावेळी नाना पटलो यांनी लगावला आहे.

दरम्यान रविवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठक बोलावली होती, त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर चर्चेत आलं आहे, यावरून देखील नाना पटोल यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देश तोडायच काम सुरु आहे, भाजपा तोडफोडचं राजकारण करत आहे.  जेपी नड्डा आधीच बोलले होते की राज्य पातळीवरचे सर्व पक्ष आपल्याला पाहिजे आहेत.  राज्यपातळीवरचे पक्ष आम्ही तोडू असे ते म्हणाले आहेत, असं यावेळी पटोले यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.