आज नवी मुंबईत आरोग्य सुविधांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. नवी मुंबई ठाणे जिल्ह्यात येते. मात्र, तरीही या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचं नाव नव्हतं. त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांची नावं होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. आज कार्यक्रम स्थळी शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं. आता शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईक यांच्यावर घणाघाती शाब्दीक हल्ला चढवला आहे. अगदी व्यक्तीगत पातळीवरची टीका केली आहे.
“जे लोक स्वतःच्या रक्ताला स्वतःचे नाव देऊ शकत नाहीत, ते काय कोणाचे नाव पुसणार?. निमंत्रण पत्रिकेच्या कागदावर नाव वगळू शकाल, पण स्वत:च्या कामाने लोकांच्या काळजावर कोरलेलं नाव कसे वगळाल?” असा सवाल खासदार ज्योती वाघमारे यांनी विचारला. “एखाद्या व्यक्तीची जलन, द्वेष, कोती मनोवृत्ती यातून हे प्रकार घडतात. हा त्यांच्या चिंधी मानसिकतेचा पुरावा आहे. आतापर्यंत तुम्ही काय नाव कमावलत? तुम्ही महिलांचे शोषण करून आणि नवी मुंबईचे डोंगर पोखरून बदनाम झालात” असा आरोप ज्योती वाघमारे यांनी केला.
ज्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे
“कधी तुमची घराणेशाही, हुकूमशाही लोकांवर लादून तर कधी स्वत:च्या संपत्तीचं निलाजरं प्रदर्शन करुन व्हाईट हाऊस बांधून तुम्ही फक्त बदनाम होण्याची काम केलीत. नाव कमावणं काय असतं, जनतेचा आशिर्वाद घेणं काय असतं हे तुम्हाला काय कळणार?. आतापर्यंत तुम्ही अशी कामं केलीत, ज्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.
तुम जलन बरकरार रखना
“मग कोणता माज आहे तुम्हाला, त्यामुळे अशा प्रकारे निमंत्रण पत्रिकेवर नाव न घालून कोणाच्या कतृर्त्वाची उंची कमी होत नसते. तुमच्या सारख्या सत्तांध, कोत्या आणि विकृत मानसिकतेचं प्रदर्शन होत असतं. तमाम शिवसैनिकांच्या वतीने एवढेच सांगेन तुम जलन बरकरार रखना, एकनाथ शिंदे साहेब जलवे बरकरार रखेंगे!” असं ज्योती वाघमारे म्हणाल्या.