ट्राय सिरीज स्पर्धेतील भारताचा तिसरा सामना श्रीलंकेविरुद्ध होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात सर्व गडी गमवून 265 धावा केल्या. तसेच विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल फेल ठरले. प्रभसिमरन सिंग, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, आयुष बडोनी, निशांत सिंधू आणि अनुकूल रॉय स्वस्तात बाद झाले. पण सूर्यांश शेडगे आणि विपराज निगम यांनी डाव सावरला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 90 चेंडूत 104 धावांची भागीदारी केली आणि संघाला सावरलं. पण या भागीदारीदरम्यान विपरज निगमने दोनदा खेळपट्टीच्या मधून धाव घेतली. त्यामुळे श्रीलंकेला फुकटात 10 धावा मिळाल्या. म्हणजेच श्रीलंकेच्या डावाची सुरुवात 0 ने नाही तर 10 धावांनी झाली.
भारताच्या विपरज निगमने पहिल्यांदा 35व्या षटकात ही चूक केली. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर खेळपट्टीच्या मधून धावला आणि त्याला पंचांनी इशारा दिला. त्यानंतर 37 व्या षटकात त्याने पुन्हा तशीच चूक केली. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर खेळपट्टीच्या डेंजर भागातून धावला. त्यानंतर पंचांनी संघावर 10 धावांची पेनल्टी ठोकली. क्रिकेटच्या नियमानुसार, खेळाडूंना पिचच्या मधल्या भागातून धावण्यास मनाई असते. या भागात धावल्याने खेळपट्टी खराब होण्याची शक्यता असते. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूचा पाच फूटांपर्यंतचा भाग धोकादायक मानला गेला आहे. हा स्टंप लाईनच्या आसपास असतो. विपरज याच भागात धाव घेतली आणि 10 धावांची फटका बसला.
दरम्यान, भारत अ संघाचे सात खेळाडू 143 धावांवरच मैदानात परतले होते. त्यामुळे तीन विकेट हातात असताना 200 धावा होतील की नाही अशी शंका होती. पण आठव्या विकेटसाठी सूर्यांश शेडगे आणि विपरज निगम यांनी शतकी भागीदारी केली आणि टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. सूर्यांश शेडगेने 66 चेंडूंमध्ये दोन षटकार आणि तीन चौकारांसह 72 धावा केल्या. तर दुसरीकडे, विपराजने 49 चेंडूंमध्ये सहा चौकारांसह 51 धावा केल्या.