तृणमुल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांच्या 20 बंडखोर खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. तृणमुल काँग्रेसच्या खासदारांनी प्रवेश करण्याआधी कोणाला हा पक्ष फार माहितही नव्हता. हा पक्ष आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात सक्रिय आहे. तृणमुल काँग्रेसचे खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार होते. पण त्यांनी NCPI पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला. आता उद्धव ठाकरे यांच्या गटातही फूट पडली आहे. त्यांचे 9 पैकी 6 खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. तशा हालचाली सुरु आहेत. दरम्यान तृणमुल प्रमाणे ठाकरेंच्या फुटलेल्या सहा खासदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमान पार्टीमध्ये यावं असं आमंत्रण आमदार रवी राणा यांनी दिलं आहे. रवी राणा यांची पत्नी नवनीत राणा भाजपमध्ये आहेत.
“जैसी करणी वैसी भरणी” अशी एकनाथ शिंदेयांच्या ऑपरेशन टायगरवर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरेंच्या फुटलेल्या सहा आमदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमान पार्टीमध्ये यावं. आमदार रवी राणा यांनी ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना खुली ऑफर दिली. ठाकरेंचे आणखी दोन खासदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावाही त्यांनी केला.
म्हणून मला उद्धव ठाकरेंनी जेलमध्ये टाकलेलं
“ठाकरें गटात फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राहणार आहेत. ठाकरे गट पूर्ण खाली होणार आहे. मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसां वाचली म्हणून नवनीत राणा आणि मला 14 दिवस उद्धव ठाकरे यांनी जेल मध्ये टाकलं होतं” असं रवी राणा म्हणाले.
वायफळ पैसा त्यांच्याकडे आहे
“एक प्रकारची अरेरावी या देशांमध्ये राबवली जात आहे. टीएमसीला तोडायचं, एनसीपीला,तोडायचं शिवसेनेला तोडायचं हे सुरू आहे. ज्या गोष्टी होत आहेत, त्या असवैधानिक पद्धतीने होत आहेत. या सगळ्याच उत्तर जनता देणार आहे. वायफळ पैसा त्यांच्याकडे आहे, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा सुरू आहे. आमची काँग्रेसच्या गटनेत्या सोबत बैठक झाली आहे. नगरसेवकांसोबत बैठक झाली आहे. आमचे नेते निर्णय कळवतील” अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.